कऱ्हाड : पंचायत समिती सभागृहाच्या उद्घाटनासाठी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर वगळता तिन्ही आमदारांना बोलविण्यात आले. उंडाळकरांसह त्यांच्या गटाच्या सदस्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार उंडाळकरांना बोलविण्याचा प्रोटोकॉल का पाळण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करीत उंडाळकर गटाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. यावेळी उंडाळकर गटाच्या अजय शिरवाडकर व लक्ष्मण जाधव यांनी पंचायत समितीच्या नवीन सभागृहाच्या उद्घाटनाची कार्यक्रमपत्रिका तसेच निमंत्रणावरून सभापती तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. याबाबत खुलासा करताना सभापतींनी निमंत्रणपत्रिका तयार करताना प्रोटोकॉलनुसार विद्यमान लोकप्रतिनिधींनाच प्राधान्य दिले असल्याचे व जाणून बुजून कोणत्याही प्रकारचे राजकारण करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. वीजवितरणच्या कामाबाबतही यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. सभापती पाटील म्हणाले, ‘गत आठवड्यात ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातील जुन्या वीज खांबांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीअंतर्गत कऱ्हाड तालुक्यातील खांबही दुरुस्त करण्यात येतील. ट्रान्सफॉर्मर्सची संख्याही वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अकार्यक्षम ठेकेदार बदलण्याची सूचना ऊर्जामंत्र्यांनी केली आहे. अकार्यक्षम ठेकेदारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे.’ रूपाली यादव यांनी शासन पातळीवर होत असणाऱ्या अशा निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी,’ अशी मागणी केली.गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. कऱ्हाड दक्षिणेत वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा कमी अधिक दाबाने होत असून, उपकरणे जळण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे वीज कंपनीने गावोगावची वीज मेंटेनन्सची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी सूचना सभापतींनी केली. लोकप्रतिनिधींकडे एखाद्या कामाची तक्रार केल्यास वीज कंपनीचे काही अधिकारी संबंधित ग्राहकाला बोलवून तक्रारीबाबत जाब विचारतात. याचा अर्थ ग्राहकांनी तक्रार करायचीच नाही का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर सभापतींनी आक्रमक पवित्रा घेत एखादा वीज कंपनीचा अधिकारी किंवा कर्मचारी अशा प्रकारे ग्राहकांना दमात घेत असेल तर त्याची थेट आपल्याकडे तक्रार करण्याची सूचना केली.मसूर पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याची मागणी करण्यात आली. अकाईचीवाडी धरणातून पाणीउपसा बंद केल्यामुळे परिसरातील गावांमधील पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत प्रशासनाने काही तरी तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी चिंता राजश्री थोरात यांनी व्यक्त केली. यावर सभापती पाटील यांनी आपण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करून महिन्यातून एक-दोन वेळा तरी पाणी सोडण्यास सांगू, असे सांगितले. (प्रतिनिधी)ग्रामसेवकावर कारवाईची मागणीमुंढे येथील गैरहजर ग्रामसेवकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी अश्विनी लवटे यांनी केली. सभापतींनीही संबंधित ग्रामसेवकास पाठीशी घालू नये, असे गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले. अनिता निकम यांनी तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवकांना ड्यूटीवर वेळेत हजर राहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी सूचना कराव्यात, अशी मागणी केली.
‘प्रोटोकॉल’च्या विषयावर सदस्य आक्रमक
By admin | Updated: March 5, 2016 00:05 IST