वडूज : आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा, या अभंगाला साजेसे विधी व्हावेत, हीच माफक अपेक्षा सर्व स्तरातील लोकांची मरणानंतर असते. परंतु याला अपवाद वडूज येथील स्मशानभुमीच्या दुरवस्थेमुळे दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राज्याला परिचित असणारी हुतात्म्याची भूमी म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासात नोंद असणारी वडूजनगरी ही विविध समस्यांमुळे सध्या चर्चेत आहे. परंतु येथील सर्व सोयी-सुविधा बरोबरीनेच मानवाच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी होणारा अंत्यविधी ही विविध समस्यांमुळे चर्चेत असून हा विधी अंधारातच करावा लागत असल्याची शोकांतिका स्मशानभुमीत पहावयास मिळत आहे. हा परिसर स्वच्छ असावा, पाण्याची विजेची समस्या नीटनेटकी असावी, यासाठी प्रारंभी प्रयत्न झाले. याबाबत उदासिनता असल्याचे प्रामुख्याने जाणविले. स्मशानभुमीत जाणाऱ्या रस्त्यालगतच शहरातील दैनंदिन कचरा गोळा करून याच परिसरात टाकला जात आहे.हा कचरा रस्त्यावरच पसरल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येरळा नदीच्या पात्राकडेलाच ही स्मशानभुमी असूनदेखील या ठिकाणी पाण्याची वानवा आहे. स्मशानभुमीपासून हाताच्या अंतरावर विजेचा खांब असूनही अंत्यविधी अंधारातच करावा लागत आहे. या परिसरात बऱ्याचेळा बल्ब बसविण्यात आले. तसेच सौर उर्जेवरचे दिवे याठिकाणी लावण्यात आले होते. परंतु काही समाजकंटकांनी याचीही विल्हेवाट लावली. त्यामुळे या सर्व कारणांचा शोध लावणे क्रमप्राप्त बनले आहे. तालुक्याची राजधानी असलेल्या वडूजनगरीची लोकसंख्या पाहता ही स्मशानभुमी अंधारापासून मुक्त व सर्व सोयीनीयुक्त असणे काळाची गरज आहे. तसेच वडूज नगरीला जोडणारे उपनगर हे अंतर जादा असल्याने या भागात शववाहिका असणे आवश्यक आहे. तसेच हा परिसर स्वच्छ ठेऊन येथे अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य व देखरेखीसाठी कामगारांची आवश्यकता आहे. यासाठी सदर सोय-सुविधांसाठी ग्रामपंचायतीने मानसिकतेत बदल करून ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)आता नाही येणे जाणे..!जसा जन्म तसाच मृत्यू असल्याची जाणीव असूनही त्या क्षणापुरता मानव भावनिक होऊन आपले मत व्यक्त करतो. परंतु निसर्गाच्या या चक्रापुढे हतबल होऊन याच स्मशानभूमीत ‘आता नाही... येणे... जाणे हा अभंग एक सुरात म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. त्यासाठी बदल घडवून ही समशानभूमी व्यवस्थीत करणे, यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.
हुतात्म्यांच्या भुमीतील अंत्यविधी अंधारातच!
By admin | Updated: December 4, 2014 23:43 IST