येथील पालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने प्रशस्त भाजी मंडई १५ फेब्रुवारीला सुरू केली आहे. शेतकरी-व्यापारी या मंडईत बसत होते. ग्राहकही तेथे जाऊन मालाची खरेदी करत होते. मात्र, मंगळवारी काही व्यापारी व शेतकऱ्यांनी मलकापूर फाटा ते मंडई हे अंतर जास्त असल्याने तेथे ये-जा करण्यास त्रास होत आहे. रिक्षा भाड्यापोटी जास्त पैसे द्यावे लागत आहेत. ग्राहक तिथे येण्यात कुचराई करत आहेत आदी कारणे सांगत कोयना वसाहत येथील गणपती मंदिरालगतच्या पालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर मंडई भरवली. ही माहिती पालिका प्रशासनाला मिळाली. पालिका कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरण्यास सुरुवात केल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यावेळी कर्मचारी व शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन गुरुवारी बैठक बोलवली. मात्र, या बैठकीकडे कोणीच फिरकले नाही.
- चौकट
जुन्या ठिकाणीच बसण्याचा हट्ट
आम्ही कोयना वसाहत ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसत आहे. आम्हाला उठविण्याचा पालिकेचा संबंध नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, तर ज्या रस्त्यावर मंडई भरते तो रस्ता पालिकेच्या हद्दीतील असून, पालिकेने तयार केलेला आहे. काही शेतकरी कोयना वसाहतीच्या हद्दीत बसत आहेत. मात्र तेथील ग्रामसेवकांनीही परवानगी दिलेली नाही, असे मुख्याधिकारी मर्ढेकर यांचे म्हणणे आहे.