शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

दृष्टी गमावूनही त्यानं शोधला प्रकाशाचा मार्ग

By admin | Updated: June 27, 2016 00:40 IST

एका जिद्दीची संघर्षगाथा : नांदवळ येथील दिनकर झगडेंचा दुकानचालक ते टेलिफोन आॅपरेटरपर्यंतचा यशस्वी प्रवास

प्रदीप यादव -- सातारा -डोळे आल्याचं निमित्त झालं अन् घरच्यांनी देवाचं आहे म्हणून अंधश्रद्धेपोटी दुर्लक्ष केलं. दृष्टी कमजोर झाली. गावठी उपचार केले अन् त्यातच दृष्टी कायमची गमवावी लागली. चौथीनंतर शिक्षणाची वाट अंधारली; पण उमेद हारली नाही. दृष्टी गमावूनही त्यानं प्रकाशाची वाट शोधली अन् त्या वाटेवर स्वार होऊन तो शिकला. स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडत राहिला. आज तो स्वत:च्या पायावर उभा आहे खंबीरपणे. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तो टेलिफोन आॅपरेटर म्हणून नोकरी करत आहे. ही कुठल्या चित्रपटाची कथा नाही तर कोरेगाव तालुक्यातील नांदवळ येथील दिनकर झगडे यांच्या जिद्दीचा संघर्षमय प्रवास आहे.कोरेगाव तालुक्यातील नांदवळ या खेडेगावात एका सामान्य कुटुंबात दिनकर झगडे यांचा जन्म झाला. गावातच प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत असताना चौथीत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पण आई-वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. दिनकर झगडे आपली दृष्टी कशी गेली, याचं चित्र ‘लोकमत’जवळ रेखाटत होते. घरातील लोक अडाणी. डोळ्याचं दुखणं त्यांना कळलं नाही. कालांतराने रात्रीचे दिसणे कमी झाले. पोराला रातआंधळेपणा आला म्हणून घरच्यांनी देव-देव करण्यास सुरुवात केली. रातांधळेपणा म्हणजे देवाचं काहीतरी आहे, या अंधश्रद्धेपोटी त्यांनी दर शनिवारी मला गावातून भाकरी मागायला लावली. बायामाणसं मला कुंकू लावून ओवाळत. ते कुंकू डोळ्यात जाऊन त्रास आणखीनच वाढला. मग गावठी उपचार सुरू झाले; पण यश मिळाले नाही. अंधश्रद्धेपोटी माझी दृष्टी कायमची गेली. वयाच्या अकराव्या वर्षी दिनकर झगडे यांना अंधत्व आलं आणि बालवयातच त्यांच्या जीवनात अंधार दाटला. शिक्षण बंद झालं. घरच्या लोकांनी पुण्याला अंधांच्या शाळेत घालण्याच प्रयत्न केला; पण आजपर्यंत सर्वसाधारण शाळेत शिकत असताना अचानक एका वेगळ्या विश्वात जायचं कसं, या प्रश्नानं आईचं व्याकुळ व्हायची. झगडे सांगत होते... आई म्हणायची माझं पोरगं शिकलं नाय तरी चालंल. उंबऱ्यात बसून घराची राखण करंल. हळूहळू गावातील रस्त्यावर फिरू लागलो. लोकांमध्ये मिसळू लागलो. आत्मविश्वास वाढला. पोहायला शिकलो. १९८७ मध्ये सत्यशोधक अंध कल्याण केंद्राच्या माध्यमातून गावातील शाळेत एकात्म शिक्षण योजना सुरू झाली. सर्वसाधारण मुलांमध्ये बसून अंध मुलांना शिकता यावं, यासाठी केंद्र शासनाची ही योजना होती. त्याचा पहिला विद्यार्थी मी होतो. रायटरची मदत घेऊन शिकत राहिलो. बारावीत नापास झालो. १९९२ मध्ये पुण्यात नॅब संस्थेच्या माध्यमातून अंधांसाठी काम सुरू केले; पण स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. नॅबचे काम करत असतानाच टेलिफोन आॅपरेटरचा कोर्स केला. पुण्यात अंधांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. अंधांना चाळीस वर्षांपर्यंत सांभाळण्याची त्यांची तयारी असते; पण कुणावर ओझं होऊन जगणं मनाला पटत नव्हतं. अखेर पुणे सोडले आणि गाव जवळ केलं.त्यावेळी ४० ते ४५ टक्के अंधत्व असणाऱ्यांना शासकीय नोकरी मिळत होती. शासनाच्या या निर्णयाबद्दल पूर्ण माहिती काढली. अंधांच्या १५० जागा रिक्त होत्या. त्याबद्दल न्यायालयात दाद मागितली. २००७ मध्ये उच्च न्यायालयाने अंधांच्या संपूर्ण जागा भरण्याचा निकाल दिला. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी संस्थेचे चेअरमन एन. डी. पाटील, सचिव अशोकराव भोईटे यांनी मोलाचे सहकार्य केले. अशा संघर्षमय प्रवासातून सध्या साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात टेलिफोन आॅपरेटर या पदावर नोकरी करत आहे. या प्रवासात पत्नी अर्चना, मुलगा आदित्य अन् मुलगी गायत्री यांची खंबीर साथ मिळाली आणि आजही मिळत आहे, असं कृतज्ञतापूर्वक झगडे सांगतात.एसटी बसमध्ये अंधांना बसण्यासाठी राखीव सीट आहेत. मात्र, अनेकदा अंध व्यक्तीला उभे राहून प्रवास करावा लागतो. याबाबत कंडक्टरला विचारले तर ‘ज्या ठिकाणाहून गाडी सुटते, तेथूनच बसावे लागते,’ असे उत्तर मिळते. मधल्या थांब्यावर एखादी अंध व्यक्ती बसमध्ये चढली तरी त्या राखीव जागेवर त्याला बसण्यासाठी जागा दिली जात नाही.’ शासनाचा हा नियम चुकीचा आहे. महामंडळाने यावर विचार करून अंधांना त्यांच्या हक्काची सीट मिळण्याबाबत प्रयत्न करावेत.- दिनकर झगडे, नांदवळआज बहुविकलांग दिन...थोर समाजसेविका हेलन केलर यांच्या जन्मदिनी म्हणजे २७ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय बहुविकलांग दिन’ पाळला जातो. त्यानिमित्त जिल्ह्यातील कर्तृत्त्ववान अंध व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्याचा छोटासा प्रयत्न आजच्या अंकात...अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्नअंधश्रद्धेमुळे मला माझी दृष्टी गमवावी लागली. इतरांच्या आयुष्यात असे घडू नये, यासाठी दिनकर झगडे यांनी आपल्या गावात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम घेऊन जनजागृती केली. ते गावात आरोग्य शिबिरांचे आयोजनही करत असतात. अंधांना स्वावलंबी बनविण्यासाठी नॅबच्या माध्यमातून ते जिल्ह्यात काम करत आहेत.