शिरवळ : खंडाळा तालुक्यातील कवठे येथील वेताळाचा माळ नावाच्या शिवारात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान िजेवणासाठी झोपडीत बसलेल्या दोन शेतकऱ्यांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शशिकांत दादासाहेब लिमन (वय ३५, रा झगलवाडी, ता. खंडाळा), खाशाबा भाऊसाहेब जाधव (६०, रा. कवठे, ता. खंडाळा) असे वीज पडून ठार झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कवठे हद्दीतील वेताळाचा माळ नावाचे शिवार आहे. या ठिकाणी झगलवाडी येथील शशिकांत लिमन यांचे मालकीची शेतजमीन आहे. संबंधित जमीन वाट्याने कवठे येथील खाशाबा जाधव यांनी करायला घेतली आहे.
रविवार सकाळी अकराच्या सुमारास शशिकांत लिमन, खाशाबा जाधव हे भुईमुगाच्या पिकाला पाणी देण्याचे काम करीत होते. काम झाल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास शेतामधील झोपडीवजा कोपीमध्ये शशिकांत लिमन व खाशाबा जाधव हे जेवणाकरिता बसले होते. तर खाशाबा जाधव यांची पत्नी व मुलगा हे कोपीच्या बाजूला बसलेले होते. दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. दीड वाजेच्या सुमारास विजांचा मोठा आवाज होत विजांचा लोळ जेवणाकरिता बसलेल्या शशिकांत लिमन व खाशाबा जाधव यांच्या झोपडीवर पडला. अचानकपणे झालेल्या घटनेमुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. झोपडीकडे खाशाबा जाधव यांची पत्नी, मुलगा व प्रशांत जाधव त्यांची पत्नी, आईने धाव घेतली. शशिकांत लिमन व खाशाबा जाधव हे गंभीर जखमी झाले होते.
शशिकांत लिमन व खाशाबा जाधव यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे झगलवाडीसह कवठे गावावर शोककळा पसरली आहे. विठ्ठल तुकाराम भोसले यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मिक मयत म्हणून नोंद झाली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलीस हवालदार विनोद पवार तपास करीत आहेत.