लोणंद : लोणंदसह परिसरात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, गुरुवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी उसामध्ये कांदा, हरभरा, आदी अंतर्गत पिकेदेखील केली आहेत. त्याबरोबरच कांदा, गहू, ज्वारी, हरभरा यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. पिकेही चांगली आली आहेत; मात्र गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
लोणंद व परिसरात गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यास उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी यामुळे गहूपिकास मोठा फटका बसणार आहे.