कऱ्हाड : स्थानिक पोलीस चिरीमिरीसाठी तक्रारदार किंवा आरोपीची अडवणूक करतात; पण महामार्ग पोलीस अडवणूक करताना अगदी जिवावरच उदार होताना दिसतायत. महामार्गावर थांबून वाहने अडविण्याची या ‘हायवे’वाल्यांची पद्धत प्रवाशांच्या अगदी जिवावर बेततेय. मात्र, कर्मचाऱ्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नसल्याची परिस्थिती आहे. परप्रांतीय वाहने अडवून हे कर्मचारी आपला खिसा गरम करतायत आणि त्यांची ही खाबुगिरी भरदिवसा सुरू असते, हे विशेष!‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा,’ असं म्हणतात; पण पोलिसांना हे शहाणपण अजूनही आलेलं दिसत नाही. आजपर्यंत अनेक कर्मचारी चिरीमिरी घेताना रंगेहाथ सापडलेत. त्यांच्यावर कारवाईही झाली आहे. मात्र, तरीही ‘खाकी’ची खाबुगिरी थांबलेली नाही. जिथे मिळेल तिथे खाण्याची वृत्ती सध्या अनेक कर्मचाऱ्यांमध्ये पाहावयास मिळते. तक्रारदार किंवा आरोपीला वेगवेगळी आमिषे दाखवून पैसे हडपण्याची पोलिसांची जुनी पद्धत आहे; पण याहीपेक्षा सध्या महामार्ग पोलिसांचा खादाडपणा सर्वांच्या डोळ्यांवर येऊ लागलाय. कऱ्हाड तालुक्यातील वाठार, मालखेडपासून ते उंब्रज, काशीळपर्यंत ठिकठिकाणी महामार्ग पोलीस दिवसाढवळ्या थांबलेले असतात. या अंतरात कधी, कुठे अपघात झाला तर हेच पोलीस सर्वांच्या पाठीमागून तिथे पोहोचतात. मात्र ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी यांची ‘हजेरी’ दररोज असते. वास्तविक, अपघात झाल्यानंतर वाहतूक नियंत्रित करण्याचे काम या पोलिसांवर आहे. मात्र अपघात सोडाच, इतर वेळीही हे कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी जागेवर भेटत नाहीत. वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी वाहने अडवून पैसे गोळा करण्यातच ‘हायवे’ पोलिसांचा दिवस जातो. तासवडे टोलनाका, बेलवडे हवेली, वनवासमाची, वारुंजीफाटा, नांदलापूर, आटकेटप्पा, मालखडे, वाठार ही या पोलीस कर्मचाऱ्यांची ‘वसुली’ची ठिकाणे आहेत. दिवसभरात किमान एकतरी कर्मचारी या गावांच्या हद्दीत पाहावयास मिळतो. कधी-कधी एकच कर्मचारी दुचाकीवरून येऊन वाहने अडवित पैसे उकळतो. तर कधी-कधी महामार्ग पोलिसांची जीपच हायवेवर थांबलेली असते. या जीपमध्ये पाच ते सहा कर्मचारी असतात. महामार्गावर थांबताना हे कर्मचारी एकाच ठिकाणी थांबत नाहीत. दोन-तीन कर्मचारी सातारा-कोल्हापूर लेनवर तर इतर कर्मचारी कोल्हापूर-सातारा लेनवर थांबतात. इतर वाहनांपेक्षा मालट्रक, ट्रेलर अडविण्यावर या कर्मचाऱ्यांचा भर असतो. महामार्गावरून एखादा ट्रक किंवा ट्रेलर वेगात निघाला असला तरी हे कर्मचारी अक्षरश: ट्रक, ट्रेलरच्या आडवे जातात. संबंधित चालकाला वाहन थांबवायला लावले जाते. किंवा महामार्गाकडेला थांबून मोठ्या आवाजात शिट्ट्या मारीत वाहने बाजूला घ्यायला लावली जातात. मात्र हा प्रकार सुरू असताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या चालकाला वाहन नियंत्रित करताना कसरत करावी लागते. समोरील वाहन अचानक थांबल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनाची अपघाताची शक्यता असते; वाहने अडवून पैसे उकळणे, एवढाच त्यांचा उद्योग असतो. (प्रतिनिधी)मराठी कळेना, हिंदी बोलता येईना !एमएच ०९ कोल्हापूर, एमएच १० सांगली, एमएच ११ सातारा, एमएच १२ पुणे व एमएच ५० कऱ्हाड ही वाहने शक्यतो पोलीस अडवत नाहीत. परजिल्ह्यातील वाहने अडविण्याचे प्रमाणही कमी आहे. मात्र, ‘टीएन’ (तामिळनाडू), ‘केए’ (कर्नाटक), ‘एपी’ (आंध्रप्रदेश), ‘जीजे’ (गुजरात), ‘एचआर’ (हरियाणा), ‘केएल’ (केरळ), ‘आरजे’ (राजस्थान) ही परराज्यातील पासिंगची वाहने दिसताच पोलीस कर्मचारी हमखास ही वाहने अडवतो. संबंधित चालकाला मराठी अथवा हिंदी कोणतीच भाषा समजत नाही. त्यामुळे पोलिसांनी अडवताच काहीही न बोलता संबंधित चालक त्यांच्या हातात पैसे ठेवून पुढे मार्गस्थ होतात. बेलवडे हवेली गावच्या हद्दीत महामार्ग पोलीस वारंवार थांबलेले असतात. वाहने अडविण्यासाठी ते अचानक महामार्गावर आडवे येतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. कागदपत्रे तपासण्याच्या बहाण्याने दुचाकी, चारचाकी, ट्रक आदी वाहने अडवली जातात. मात्र, त्यांच्यावर काय कारवाई होते, हा संशोधनाचा विषय आहे. ही तपासणी आहे की लूट, असा प्रश्न अनेकवेळा पडतो. हा प्रकार थांबला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रार करणार आहोत. - अमित जाधव, जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय, साताराकधी ‘एन्ट्री’ तर कधी हप्ता !एखाद्या वाहन चालकाने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली व वाहनांमध्येही काही दोष आढळून न आल्यास पोलीस कर्मचारी त्याच्याकडे ‘एन्ट्री’ची मागणी करतात, ही परिस्थिती अनेक महिन्यांपासून महामार्गावर दिसून येत आहे. ‘एन्ट्री’ बरोबरच ‘मंथली’ वसूल करण्यासाठीही येथे कर्मचारी घिरट्या घालीत असल्याचे दिसून येत आहे. ‘एन्ट्री’ बरोबरच ‘मंथली’ वसूल करण्यासाठीही येथे कर्मचारी घिरट्या घालतात. वडाप वाहनांबरोबरच वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला पोलीस कर्मचारी येथे ठाण मांडून असतात.पैशावरून पोलिसांत वादावादीतासवडे टोलनाक्यानजीक काही महिन्यांपूर्वी ‘एन्ट्री’ घेण्याच्या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच वादावादी झाली होती. टोलनाका कोणत्या पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येतो व त्यानुसार ‘एन्ट्री’चे पैसे कोणी घ्यायचे, या कारणावरून ही वादावादी झाली होती. पैशासाठी वारंवार होणारा हा ‘तमाशा’ अनेकवेळा वाहनधारकांनीही ‘याची देही, याची डोळा’ पाहिला आहे. हा वाद वाहनधाक व टोलनाका कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार चर्चेचा विषय ठरतो.
जाऊ तिथे खाऊ... मग ‘हायवे’ का सोडू ?
By admin | Updated: November 28, 2015 00:21 IST