लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : राष्ट्रीय महामार्गवरील आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा नित्याची बाब बनली आहे. वाहनांच्या शंभर मीटर रांगा लागल्यानंतर वाहने शुल्क न घेता सोडण्याचा नियम असूनही नाक्यावर शंभर मीटरपेक्षाही जास्त रांगा लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
गेली अनेक वर्षे राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर टोल वसुली केली जाते आहे. या टोलवसुलीविरोधात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरिकांनी तीव्र आंदोलने करीत आहेत. रस्ता बनविण्यासाठी आलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पट वसुली होऊनही टोलच्या नावाखाली जनतेची लूट चालल्याचा आरोप आजवर अनेकदा करण्यात आला आाहे. आनेवाडी टोल नाक्यावर शनिवार, रविवार, तसेच सुटीच्या दिवशी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागतात.
वाहनांच्या रांगा लागल्याने चालकांचा वेळ वाया जाऊन पेट्रोल, डिझेलचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्यामुळे वाहन चालक रोष व्यक्त करीत आहेत. राष्ट्रीय मार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्ते खराब झाले आहेत. मात्र, टोलचे शुल्क वाढतच चालले असून, सुविधांचा अभावही जाणवत आहे.
फोटो : १२ वाई