सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये २१-० असा एकतर्फी पराभव करीत सत्ताधारी भागधारक पॅनेलची ‘रिक्षा’ सुसाट धावली, तर विरोधी परिवर्तन पॅनेलची ‘पतंग’ वरच्यावरच कटली. ‘भागधारक’चे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. प्रकाश गवळी, शिरीष चिटणीस, प्रकाश बडेकर, राजन जोशी, रफिक बागवान, दीपक पवार, डॉ. अच्युत गोडबोले या सहा विद्यमान संचालकांना पराभवाचा धक्का बसला आहे. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तात छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला खुल्या प्रवर्गातील १६ जागांसाठी उभ्या राहिलेल्या ३३ उमेदवारांना पडलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. मोजणीच्या पाच फेऱ्या पार पडल्या. या पाचही फेऱ्यांमध्ये भागधारक पॅनेलच्या सर्वच उमेदवारांनी मोठ्या फरकाने आघाडी घेतली होती. सर्वसाधारणनंतर महिला राखीवची मोजणी झाली. भागधारक पॅनेलच्या सुजाता राजेमहाडिक व डॉ. चेतना माजगावकर यांनी विजय मिळविला. इतर मागास प्रवर्गातून अशोक मोने यांनी तर भटक्या जमातीमधून बाळासाहेब गोसावी विजयी झाले. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विजय बडेकर यांनी विजय मिळविला. भागधारक पॅनेलवर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. बहुचर्चित जनता बँकेच्या निवडणुकीसाठी विनोद कुलकर्णी, अॅड. मुकुंद सारडा यांच्या नेतृत्वाखालील भागधारक पॅनेल विरुद्ध प्रकाश गवळी, डॉ. अच्युत गोडबोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलमध्ये झुंज झाली. गेल्या महिनाभर प्रचाराचा धुरळा उडाला होता. गुरुवारी ५४ टक्के मतदान झाले होते. १९ हजार ७७ मतदारांपैकी १० हजार ९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
पतंग कटली... रिक्षा सुसाट!
By admin | Updated: June 4, 2016 00:32 IST