सातारा : किसनवीर आबांनी स्वातंत्र्यापूर्वी अंगिकारलेले देशसेवेचे व्रत नि:स्वार्थीपणे पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधीत्वाची पदे जबाबदारीने व यशस्वीरित्या भूषविली. या कारकिर्दीत किसनवीर महाविद्यालय, किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्यास सज्ज असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा विविध संस्था सुरु करण्यामागे आबांचा मोठा वाटा आहे, असे उद्गार जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी काढले. जिल्हा बँकेतर्फे देशभक्त किसनवीर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. सरकाळे म्हणाले, ‘बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील आणि आबासाहेब वीर इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभल्यामुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. देशातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये ही अग्रगण्य बँक आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून, बँकिंग कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपत आहे.’
यावेळी सरव्यवस्थापक राजीव गाढवे, आर. एम. भिलारे, सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधीक्षक, सेवक यांनी प्रतिमेला फुले वाहून किसनवीर आबांना आदरांजली वाहिली.
याचबरोबर बँकेच्या पोवई नाका, सातारा येथील यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र इमारतीच्या प्रांगणातील आबासाहेब वीर यांच्या पुतळ्याला हार घालून व फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली.
फोटो नेम : ०१ डीसीसी ०२