खंडाळा : शिक्षणाबरोबर सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचे काम मराठी शाळांमधून शिक्षकांकडून घडत असते. म्हणूनच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपण अग्रेसर राहून काम करू. त्यासाठी शिक्षकांची ताकद एकसंध ठेवा,’ असे आवाहन वाई, खंडाळा, महाबळेश्वराचे आमदार मकरंद पाटील यांनी केले.सातारा जिल्हा व खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटाचे अधिवेशन खंडाळा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सभापती रमेश धायगुडे, उपसभापती सारिका माने, संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे, मधुकर काठोळे, मनोज पवार, प्रदीप माने, जिल्हाध्यक्ष बाळासो साळुंखे, प्रदीप घाडगे, बँकेचे संचालक महेंद्र अवघडे, संजय शेजवळ, रमेश पाटील, तुकाराम कदम, माजी संचालक मच्छिंद्र ढमाळ, नानासो शेडगे, राजेंद्र काकडे, शिवाजी सोळसकर, सुधीर भोसले, नवनाथ क्षीरसागर, दशरथ धायगुडे, राजेश जगताप आदी उपस्थित होते.आ. पाटील म्हणाले, शिक्षक संघाला मोठी पार्श्वभूमी आहे. संघाच्या पाठीमागे मोठी शक्ती असल्यामुळेच प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले. शिक्षकांची राज्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून शिवाजी पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारकीची संधी दिली. सामान्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शिक्षकांचे प्रश्न विधिमंडळात मार्गी लावण्याचा आणि पदाला योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी केले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्त लक्षात घेता मराठी शाळा टिकविण्याची जबाबदारी शिक्षकांची आणि पालकांचीही आहे.शिक्षक नेते माजी आमदार शिवाजी पाटील म्हणाले, ‘संघटनेच्या जोरावर शिक्षकांच्या अनेक व्यथा शासनापुढे मांडून त्या सोडवून घेतल्या. सध्याचे युग यंत्रयुगाचे आहे. यामध्ये शिक्षकांवर अनेक बंधने आली असून, अध्यापनाच्या मूळ उद्देशासाठी शिक्षकाला वेळ मिळत नाही. गरिबांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत. त्या टिकविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. या संघटनेला वेगळी दिशा आहे. त्यामुळे शिक्षक कधीही आपल्या कामापासून विचलित होत नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण कमिटीवर शिक्षकांना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे. ही मागणी या संघटनेमुळेच मंजूर झाली, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कमिटीत संघटनेच्या जिल्हाध्यक्षालाच संधी मिळाली पाहिजे,’ यावेळी जिल्हा व तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मच्छिंद्र ढमाळ यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीस म्हणून प्रदीप घाडगे यांची निवड झाली. खंडाळा तालुकाध्यक्ष म्हणून दशरथ धायगुडे व चिटणीस म्हणून दत्तात्रय साळुंखे यांची निवड झाली. नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)मच्छिंद्र मुळीकांवर टीकापन्नास लाखांच्या आलिशान गाडीत फिरणारे, शाळेकडे न फिरकणारे व निलंबित झालेले जिल्हाध्यक्ष जिल्हा शिक्षण कमिटीवर सदस्य म्हणून काम करतात. याबाबत शिवाजी पाटील यांनी खंत व्यक्त केली व आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ही संधी द्यावी, अशी मागणी केली.खंडाळ्याला बँकेचे माजी संचालक मच्छिंद्र ढमाळ यांची संघाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली त्यामुळे खंडाळ्याला संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदाचा मान मिळाला. त्यामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
जिल्ह्यातील शिक्षकांची ताकद एकसंध ठेवा
By admin | Updated: November 30, 2015 01:18 IST