पाटण : पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेला गटविकास अधिकारी व इतर तीन सदस्य गैरहजर होते. तर तब्बल दोन तास चाललेल्या या सभेत काही प्रमुख विषय वगळता निव्वळ कालवा झाल्याने काही सदस्यांसह बहुतेक अधिकारी उठून गेले. सभेत आढावा देणाऱ्या अधिकाऱ्याचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत सभापती, उपसभापती व प्रमुख सदस्य नव्हते. तसेच काही सदस्य मोबाईलवर मग्न होते. त्यामुळे सभा आहे की नाही, असेच चित्र होते. सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा सुरू झाली. एक वाजताची सभा दीडला सुरू झाली. त्याअगोदर सभापती कक्षात देसाई-पाटणकर गटांच्या सदस्यांचे जणू मनोमिलन झाले की काय, असे चित्र दिसत होते. त्यामुळे क्षणातच सुरू होणाऱ्या सभेत जनतेच्या प्रश्नावर सदस्य पोटतिडकीने बोलतील, असे संकेत दिसत नव्हते. त्यातच आरोग्य वनविभाग, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे प्रमुख अधिकारी हजर नव्हते. तरीसुद्धा काही मोजक्याच विषयांवर चर्चा झाली. शिक्षण विभागातील कामकाजाची माहिती सदस्यांना दिली जात नाही. तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण सभापती येऊन गेले ते सदस्यांना माहिती नाही. प्रगत आणि अप्रगत शाळांची माहिती बोगस दिली जाते. याबाबत रामभाऊ लाहोटी, राजाभाऊ शेलार यांनी आक्रमक भूमिका घेतली. पांथरपूंज या दुर्गम भागातील शाळेत एक महिला शिक्षक रुजू होत नाही. याबाबत शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यादरम्यान पांथरपूंज ग्रामस्थ तेथे उपस्थित राहिले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी जगताप यांना त्या महिला शिक्षक हजर राहतील, असे आश्वासन द्यावे लागले. तालुक्यातील ४४ गावे ८८ वाड्या-वस्त्यांना टंचाई भासणार असून, त्यांचे पाणी मागणी प्रस्ताव पाठविले आहेत. कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला हे कामावर का नाहीत, असे शोभा कदम व राजाभाऊ शेलार यांनी विचारले. तर कृषी सहायक गावागावांत जात नाहीत. अशी तक्रार नथुराम कुंभार यांनी केली. (प्रतिनिधी)मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळमोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जाधव हे पंचायत समिती पदाधिकारी व जनतेला जुमानत नाहीत. ते वारंवार गैरहजर असतात. आरोग्य केंद्रातील कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे आरोप उपसभापती डी. आर. पाटील, नथुराम कुंभार, विजय पवार यांनी केले.उपसभापतींनी केली नाराजी व्यक्तसभेची सांगता करताना उपसभापती डी. आर. पाटील यांनी आजच्या बैठकीस अधिकारी व सदस्य यांची गैरहजेरी लक्षणीय दिसली. तोंडावर दिवाळी आल्याचा परिणाम दिसतोय, असा टोला मारून नाराजी व्यक्त केली.आमसभा तातडीने घ्यावीसन २००७-०८ मध्ये तालुक्याची आमसभा झाली होती. त्यावेळी सुद्धा गोंधळ झाल्याने ती रद्द झाली. त्यानंतर आजपर्यंत आमसभा झाली नाही. तेव्हा सभापतींनी तातडीने आमसभा आयोजित करावी, अशी मागणी विजय पवार यांनी केली.लोकसंख्या जनगणनेचे काम माध्यमिक शिक्षकांनी करण्यास विरोध दर्शविला आहे. तेव्हा तसा ठराव घ्यावा, असे शोभा कदम म्हणाल्या. तर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांनी लोकसंख्या गणनेचे काम करावे, असे मत राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केले. त्यावर सभागृहात मोठा हशा पिकला
पाटण पंचायत समिती सभेत ‘कालवा-कालवा’
By admin | Updated: October 30, 2015 23:20 IST