सातारा : ‘पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. पर्यायाने त्यांच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा उत्कर्ष होतो. त्यामुळे माण-खटावमधील शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी जिहे-कटापूर योजना कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार,’ अशी ग्वाही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. उरमोडीचे पाणी डाव्या कालव्यामध्ये पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते सोडण्यात आले. या पाण्याच्या जलपूजनानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य अभियंता खलील अन्सारी, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, हरणाई सूतगिरणीचे अध्यक्ष रणजित देशमुख आदी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, ‘प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दोन कोटी जनता उसावर अवलंबून आहे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पाणी आमूलाग्र बदल घडवून आणते. म्हणून माण, खटावसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी जिहे-कटापूर ही योजना कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार. उरमोडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील. अंबवडे ग्रामस्थांच्या पुलासाठी तत्काळ प्रस्ताव बनवून द्यावा. त्याचबरोबर धरणाच्या वरच्या भागात सरकलेल्या गावांना निश्चितपणे नागरी सुविधा देण्यात येतील. त्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा करून सध्या अस्तित्वात असणारा शासन निर्णय रद्द केला जाईल. मागच्या पिढीने आपल्याला जलसाठे दिले. पुढच्या पिढीला जलसाठे हस्तांतरित करताना त्याचे सुनियोजन करावे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचनाचा वापर करावा.’ कार्यक्रमाचे कायर्कारी अभियंता शरद दाभाडकर यांनी स्वागत केले. मुख्य अभियंता खलील अन्सारी यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. धरणग्रस्तांचे प्रतिनिधी म्हणून जयसिंग निकम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सहायक अभियंता ज्योती दिवेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाला तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार तसेच अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिहे-कटापूर योजना पूर्ण करणारच !
By admin | Updated: April 10, 2016 00:10 IST