लोकमत न्यूज नेटवर्क
खटाव: ‘दुष्काळी खटाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या जिहे-कठापूर योजनेचे पाणी नेर तलावात पंधरा दिवसात येणार आहे. सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ही योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याचा मनस्वी आनंद होत आहे’, असे प्रतिपादन गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुहास जोशी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, सरपंच अभय घाडगे, रणधीर जाधव आदी उपस्थित होते.
सुहास जोशी म्हणाले, ‘आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात आली असून, आता पंधरा दिवसांची प्रतीक्षा उरली आहे. योजनेचे काम कित्येक वर्षांपासून रखडले होते. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून केंद्रीय जल आयोगाची तसेच केंद्र शासनाची परवानगी मिळवून हे काम तडीस नेण्यासाठी ट्रस्टच्या सदस्यांचेदेखील योगदान तितकेच महत्त्वाचे आहे.’
कार्यक्रमाला ट्रस्टचे सदस्य चरण बोबडे, संजय टकले, उमेश भिसे, बाळ इनामदार, अभिजीत देशमुख, विशाल देशमुख, शेखर देशमुख, ताईमुर मुल्ला, रोहन देशमुख, विशाल भोसले, अमोल फडणीस, सुदीप देशमुख, राहुल जमदाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : २२ लक्ष्मणराव इनामदार
खटाव ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नंदकुमार वायदंडे, अमर देशमुख, सुहास जोशी, राहुल पाटील उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)