म्हसवड : जाशी (ता. माण) येथील ऋतुजा शांतिलाल पाटील हिने वयाच्या सतराव्यावर्षी कादंबरी लेखनाचं एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या अठराव्यावर्षी तिने कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली आणि वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तिने ‘झुळूक’ ही कादंबरी लिहून पूर्ण केली. तिची ही कादंबरी आता प्रकाशित होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जाशी (ता. माण) या दुष्काळी भागातील छोट्याशा गावात जन्मलेल्या ऋतुजा पाटील हिने वयाच्या सतराव्यावर्षी कादंबरी लेखनाचं एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या अठराव्यावर्षी तिने कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. परंतु अचानक तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे वडील आपल्या मुलीचे स्वप्न पाहण्याआधीच देवाघरी गेले. त्यातून तिला सावरण्यासाठी व त्या दुःखाच्या ढिगाऱ्यातून बाहेर निघण्यासाठी खूप वेळ गेला. तरीसुद्धा तिने जिद्द, चिकाटी न सोडता व हार न मानता त्यातून बाहेर पडत एकोणीसाव्यावर्षी कादंबरीचे उर्वरित लिखाण पूर्ण केले आणि साहित्य क्षेत्रामध्ये एक उत्तुंग भरारी घेतली. खरं तर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. ऋतुजा हिने आपले पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण जाशी या गावामध्ये पूर्ण केले. उर्वरित शिक्षणाच्या वाटचालीस ती सातारा येथे यशवंतराव चव्हाण कॉलेजला गेली व तेथे बारावी झाल्यानंतर, तिने यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे डिप्लोमाला प्रवेश घेतला; परंतु ताण-तणावामुळे व वडिलांच्या आठवणींमुळे डिप्लोमा तिने अर्ध्यातच सोडून दिला आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे तिने बी.ए. च्या पहिल्या वर्षास प्रवेश घेतला. तसेच मराठी दैनिकांसाठी ती लेखांचेही लिखाण करत असते. तिचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत. शिक्षण घेत अनेक परिस्थितीशी तोंड देत तिने साहित्य लिखाणाची चिकाटी कायम ठेवल्याने तिने ‘झुळूक’ ही कादंबरी एवढ्या कमी वयात लिहून पूर्ण केली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोट..
‘झुळूक’ या कादंबरीचे प्रकाशन पुढच्या महिन्यात करण्यात येणार असून सध्या मी ‘वणवा’ ही दुसरी कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली आहे.
- ऋतुजा पाटील, जाशी (ता. माण)
०४ऋतुजा पाटील