कऱ्हाड : महात्मा गांधींनी देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर समाज आणि व्यवस्थेशी संबंधित विचार मांडले. त्यांच्या या विचारांना आपण अंगिकारणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, मलकापूर शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र यादव, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष झाकीर पठाण, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव थोरात यांच्यासह मलकापूरचे नगरसेवक उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गांधीजींची सत्य, अहिंसा, सत्याग्रह अशी अनेक तत्व आजच्या काळात समर्पक आहेत. गांधीवादाने जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यवादी सत्तेला उखडून फेकले गेले. यापासून अनेक दुर्बल देशांनी प्रेरणा घेत स्वातंत्र्य मिळवले. गांधींच्या विचारांना आजही जगात ऐकले जाते. सत्तर वर्षांपूर्वी त्यांचा जीव घेतला गेला; पण त्यांच्या तत्वांना ज्याला आपण गांधींवाद म्हणतो त्याला कोणीही मारू शकत नाही. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : ०१केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिवादन केले.