लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडी वाढत चालली असून, सातारा शहराचाही पारा घसरला आहे. गुरुवारी किमान तापमान १२.०१ अंश होते. दरम्यान, सायंकाळपासूनच थंडीला सुरुवात होत असल्याने बाजारपेठेवरही परिणाम होऊ लागलाय.
जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर थंडीला सुरुवात झाली. हळूहळू थंडी वाढू लागली. दिवाळीच्या दरम्यान किमान तापमान १२ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. मात्र, त्यानंतर थंडी गायब झाली होती. किमान तापमान २१ अंशांवरही गेल्यामुळे उकाडाही जाणवत होता. त्यानंतरही थंडीच्या प्रमाणात सतत चढ-उतार सुरू होता. असे असले तरी डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशांखाली आलेले, तर सातारा शहरात नऊ अंश तापमानाची नोंद झाली होती. दोन वर्षांतील हे नीचांकी तापमान ठरले होते.
डिसेंबर महिन्यात कमी तापमान होते. त्यामुळे पुन्हा थंडी कमी झाली. जानेवारी महिन्यातही थंडी कमीच राहिली. १५ ते १७ अंशांदरम्यान सतत किमान तापमान होते, तर फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर गार हवा वाहू लागली. किमान तापमानही कमी झाल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातही गारठा वाढू लागला आहे. त्यातच वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्रीही पिकांना पाणी देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी थंडीने बेजार झाले आहेत.
चौकट :
सातारा शहरातील किमान तापमान असे :
दि. २६ जानेवारी १५.०७, दि. २७ जानेवारी १४.०६, दि. २८ जानेवारी १४.०२, दि. २९ जानेवारी १४.०७, दि. ३० जानेवारी १४.०६ आणि ३१ जानेवारी १५.०१, दि. १ फेब्रुवारी १५, दि. २ फेब्रुवारी १७.०२, दि. ३ फेब्रुवारी १२.०९ आणि ४ फेब्रुवारी १२.०१.
......................................................