सातारा : येथील समर्थ मंदिर तिकाटण्यावर बोगद्याकडून येणाऱ्या एसटी बसेस तिरक्या लावून तिन्ही रस्त्यांवरची वाहतूक रोखून धरण्याचा जुनाट शिरस्ता हद्दपार होण्याचा मार्ग खुला झाला आहे. समर्थ मंदिर ते अदालत वाडा रस्त्यावर नवा थांबा करण्यासाठी महामंडळाकडून गुरुवारी सर्वेक्षण करण्यात आले.सज्जनगड, कास, बामणोली येथून सातारा शहरात येणाऱ्या एसटी गाड्या पूर्वीपासूनच समर्थ मंदिर परिसरात उभ्या राहत आहेत. त्याकाळात फारशी अडचणही भासत नव्हती; मात्र आता समर्थ मंदिर परिसरात दुकाने तसेच धस कॉलनी, चिपळूणकर बाग, शिक्षक कॉलनी, गुरुकुल कॉलनी झाली आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या वाढली आहे. प्रत्येकाच्या घरी किमान दोन दुचाकी गाड्या आल्या आहेत. त्यामुळे हा चौक कायमच वर्दळीचा बनला आहे.दररोज सकाळी नऊ ते अकरा व सायंकाळी पाच ते सात या काळात या चौकात प्रचंड गर्दी असते. तरीही बाहेर गावाहून आलेल्या गाड्या चौकात तिरक्याच लावल्या जातात. याचवेळी आणखी एक-दोन गाड्या आल्या तर सर्व गाड्या एकामागे एक उभ्या असतात. या समस्यावर ‘लोकमत’ने अनेक वेळा आवाज उठविला आहे. त्यानंतर स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर सुहास राजेशिर्के व ज्येष्ठ नागरिक संघाचे देशपांडे यांनी सह्यांची मोहीम राबविली. हे निवेदन त्यांनी एसटीचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी दिले. ‘लोकमत’ने मांडलेल्या जनतेची व्यथा आणि स्थानिकांच्या भावनांचा आदर करत राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभागीय वाहतूक कार्यालयातील वाहतूक निरीक्षक मनोज देशमुख व सातारा आगारातील स्थानक प्रमुख नौशाद तांबोळी यांनी चौकात येऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)पर्यायी जागा अन् स्टेजचा मेळ बसविण्याचा प्रयत्नतिकाटण्यात गाडी उभी केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यावर पर्याय म्हणून गोविंदनगरी वसाहतीसमोर असलेल्या विस्तृत जागेत गाडी उभी करणे सोपे आहे. मात्र, बाहेर गावाहून येणार असलेल्या गाड्यांचे स्टेज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जागा आणि स्टेज यांचा अभ्यास करून जागा निश्चित केली जाणार आहे.
समर्थ मंदिराजवळचा थांबा हटविण्यासाठी पाहणी
By admin | Updated: October 30, 2015 23:41 IST