सातारा : बुधवारी झालेल्या ढगफुटीमुळे सर्वाधिक नुकसान वाहनांचे झाले आहे. यापैकी ज्या गाडीच्या इंजिनात चिखलमिश्रित पाणी गेले असेल, ती गाडी कायमची खराब झाली असे समजावे, अशी माहिती वाहनदुरुस्ती क्षेत्रातील व्यक्तींनी दिली. अनेक गाड्या आज ‘स्टार्ट’च झाल्या नाहीत. गाड्या दुरुस्ती करणाऱ्यांकडे आणि ‘सर्व्हिस स्टेशन’मध्ये गुरुवारी वाहनचालकांची रीघ लागली होती.साताऱ्यातील बुधवारच्या पावसात अनेक वाहने अक्षरश: डुंबत होती. यात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. दुचाकी वाहने तर अनेक ठिकाणी प्रवाहाबरोबर लांबवर वाहून गेली. अस्ताव्यस्त वाहनांमध्ये चिखलमिश्रित पाणी शिरले. हे पाणी इंजिनमध्ये शिरले असल्यास गाडीची दुरुस्ती जवळजवळ अशक्य आहे, असे एका दुचाकी कंपनीच्या तज्ज्ञांनी सांगितले. या कंपनीच्या शोरूममध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे बावीस दुचाकी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्या, तर काही दुचाकींमध्ये पाणी शिरून त्या निकामी झाल्या. यात नव्या दुचाकींबरोबरच काही खरेदीदारांनी सर्व्हिसिंगसाठी दिलेल्या गाड्यांचाही समावेश आहे. चोरट्यांकडून संधी साधून या गाड्यांमधील सुटे भाग चोरीला जाण्याची शक्यता असल्यामुळे या गाड्या सुरक्षित ठिकाणी हलविल्या जातील आणि नंतर त्यांची तपासणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शहराच्या अनेक भागांत चारचाकी वाहने निम्म्याहून अधिक पाण्याखाली बुडाली. यातील अनेक वाहने आज ‘स्टार्ट’ होत नव्हती. (प्रतिनिधी)माझ्या शोरूममधील २२ वाहनांचे नुकसान झाले आहे. याखेरीज शोरूममध्ये पाणी शिरल्याने आॅईल, सुटे भाग यासह झालेले एकंदर नुकसान सुमारे बारा लाखांच्या घरात गेले आहे. कंपनीने तातडीने तंत्रज्ञ पाठविले आहेत. सुरक्षित ठिकाणी नेऊन गाड्यांची तपासणी केली जाईल.- इंद्रजित मोहिते, व्यावसायिक बुधवारच्या पावसात माझ्या गळ्यापर्यंत पाणी आले होते आणि वाचवायलाही कोणी येऊ शकत नव्हते. शोरूममध्ये साचलेल्या पाण्यात आॅइलचे आणि अॅसिडचे कॅन सांडले, तेव्हा अंगाची आग होऊ लागली. तशा स्थितीत तीन तास घालवल्यानंतर माझी सुटका झाली आणि मग मी उपचार घेतले.- स्वाती केळकर, सर्व्हिस मॅनेजर
इंजिन वाचलं तर गाडी वाचली!
By admin | Updated: August 22, 2014 00:50 IST