वाई : ‘वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील काही शासकीय अधिकारी सर्वसामान्य जनतेची कामे न करता तिची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना काँग्रेसच्या माध्यमातून धडा शिकविण्यात येईल,’ असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी रविवारी दिला.
वाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट, प्रतापराव देशमुख, अतुल संकपाळ, विशाल डेरे, विकास जाधव उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘सध्या काही शासकीय अधिकारी लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून काही त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. शासकीय अधिकारी, बँका, पतसंस्थेचे अधिकारी हे जनतेला नाहक त्रास देतात. सर्वसामान्य जनतेला कोणी वाली राहिला नाही, अशा भ्रमात शासकीय अधिकाऱ्यांनी राहू नये. सध्या लॉकडाऊनमध्ये वाढलेल्या प्रचंड महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. धंदे, व्यवसाय अनेक दिवस बंद असल्याने, रोजगार नसल्याने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. बँका पतसंस्था, सरकारी देणी, घरपट्टी, पाणीपट्टी, भरमसाट आलेली वीज बिले अशा नाना समस्यांचा सामना करता करता सगळी जनता भरडून निघाली आहे. घर चालविणे मुश्किल झालेल्या सर्वसामान्य जनतेला कसलाही दिलासा मिळालेला नाही.’
शिंदे म्हणाले, ‘सध्या सगळ्याच सरकारी कार्यालयांत लोकांची काही अधिकाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक सुरू आहे. सर्वसामान्य लोकांची पैशाअभावी कामे होत नाहीत. हेलपाटे मारून जनता त्रस्त झाली आहे. याचा अर्थ या सरकारी अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिलेला नाही. सर्वसामान्य जनतेची लूट करण्याची परवानगी या अधिकाऱ्यांना कोणी दिली? कोरोनासारख्या संकटामुळे अधिकारी लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे होती; पण तसे होताना दिसत नाही.’