पाटण : ‘पाटणकरांच्या २६ वर्षे आमदारकी व पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतही पाटण तालुक्यात विकासाचा प्रचंड मोठा अनुशेष मागे राहिला आहे. त्यांच्या निष्क्रिय कारकिर्दीचे परिणाम आज जनतेला भोगावे लागत आहेत. मी आमदारकीच्या पहिल्याच वर्षात ९६ कोटींची कामे आणली असून, दरवर्षी असे शेकडो कोटी रुपये आणावे लागतील. त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून निधी खेचून आणावा लागतो. केवळ वाड्यात बसून जनतेची कामे कशी होणार?,’ असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला. युती शासन आपल्या दारी या स्वत:च्या संकल्पनेतून नियोजन केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यातील १६ गावांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, अंगणवाडी आदींसाठी २ कोटी ४४ लाखांचा निधी खर्ची होणार आहे. त्या कामाची भूमिपूजने आमदार देसाई यांच्या हस्ते झाली. आमदार देसाई म्हणाले, ‘पाटणकरांना तालुक्याने नाकारले आणि मी आमदार झालो. आता मला लोकांच्या दारात गेले पाहिजे. मला विकास करायचा आहे. त्यासाठी बारकाईने नियोजन करावे लागणार आहे. तालुक्यातील सामान्य माणसाला बदल जाणवला पाहिजे. म्हणूनच लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी प्रशासन बरोबर घेऊन लोकांच्या दारात जात आहे. २००९ मध्ये माझा पराभव झाला तरीसुद्धा दुसऱ्याच दिवशी मी गावागावांमध्ये फिरलो. मला जय-पराजय याचे काही देणे-घेणे नाही. लोकांच्या व्यथा जाणून घेणारा आमदार म्हणून मला ओळखलं पाहिजे, नाहीतर पाटणकर पितापुत्र पराभवाच्या वर्षपूर्तीनंतर किती वेळा तुमच्या दारात आले, असा सवाल शंभूराज देसार्इंनी जनतेला विचारला. (प्रतिनिधी)
९५ कोटी आणणारा एकमेव आमदार... सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाटण तालुक्यासाठी वर्षभरात ९५ कोटींचा निधी आणणारा एकमेव आमदार असल्याचा दावा करून शंभूराज देसाई म्हणाले, ‘आमदारकीच्या एका वर्षाची पोचपावती मी जनतेला दिली आहे. ९५ कोटींपैकी एक-एक रुपयाचा हिशेब मी सांगू शकतो.’