सातारा : कुणी दूरचित्रवाणी संच म्हणतो, कुणी त्याला छोटा पडदा संबोधतो, तर कुणी त्याची इडियट बॉक्स म्हणून संभावना करतो. दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांवर चोवीस तास विविध विषयांवर आधारित मालिका, रिअॅलिटी शो, चित्रपटांचे खेळ, टॉक शोज, बातम्या यांसारख्या माहितीचा धबधबा कोसळत असतो. टीव्हीवर टीआरपी-जीआरपी मिळविण्यासाठी वाहिन्यांमध्ये तीव्र स्पर्धाही बघायला मिळते. वाहिन्यांवर हा टीआरपी-जीआरपी मिळविण्यासाठी प्राइम टाइम अर्थात सायंकाळी ७ ते ११.३० वाजेची वेळ महत्त्वाची मानली जाते. याच प्राइम टाइममध्ये अनेक मालिकांचा अक्षरश: रतीब घातला जातो. प्राइम टाइममधील मालिकांचा सर्वाधिक प्रेक्षक आहे तो महिलावर्ग. मालिकांचा महिलांवर असलेला पगडा लक्षात घेता एकूणच मालिकांबाबत गृहिणींची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने एक प्रश्नावली त्यांच्यासमोर मांडली. या सर्वेक्षणांतर्गत महिलांची मते जाणून घेण्यात आली. त्यातून निघालेले निष्कर्ष व बोलक्या प्रतिक्रियांवर आधारित हा स्पेशल रिपोर्ट...प्राइम टाइममध्ये दाखविल्या जाणाऱ्या काही मालिकांच्या दर्जाविषयी गृहिणींनी नापसंती व्यक्त केली. सुरुवातीला कथानक चांगले वाटते नंतर त्यात जी काही घुसवाघुसवी केली जाते, त्याला गृहिणींनी आक्षेप नोंदविला आहे. त्याबाबत रितेश देशमुखचे ताजे उदाहरण काही गृहिणींनी दिले. अभिनेता रितेश देशमुख याचा ‘लय भारी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शनापूर्वी झी मराठीने त्याची मोठी जाहिरात केली. ही जाहिरात करताना झीने मालिकांनाही टार्गेट केले. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकांमध्ये अभिनेता रितेश देशमुखची एण्ट्री दाखवून त्या-त्या कुटुंबाला ‘लय भारी’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. मुळात मालिकेच्या आशयाला धक्का लावणारी अशी घुसखोरी नसावी, अशी भावना गृहिणींनी व्यक्त केली. प्रमोशनचा हा फंडा गृहिणींना रुचला नसल्याचे दिसून आले. काही मालिकांमध्ये केवळ ग्लॅमर दाखविले जात असल्याचीही काहींची तक्रार आहे. मराठी मालिकांचा दर्जा ढासळत असल्याचे मत काही गृहिणींनी परखडपणे व्यक्त केले. प्राइम टाइम पूर्वी रात्री ९ वाजेपर्यंतचा असायचा. आता हिंदी व मराठी वाहिन्यांनी प्राइम टाइम पुढे सरकवत तो पार रात्री ११.३० वर नेला आहे. त्यामुळे आता सायंकाळी ७ ते रात्री ११.३० असा प्राइम टाइम बनला आहे. स्वयंपाकघरात आता स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तूंबरोबरच टीव्हीच्या रिमोटनेही जागा पटकावली आहे. सर्वेक्षणानुसार, गृहिंणींकडून स्वयंपाकाची तयारी करण्याची वेळ सायंकाळी ७.३० ते ८ वाजता नोंदवली गेली आहे. मोठे कुटुंब असेल तर त्याठिकाणी सायंकाळी ६ वाजेपासूनच तयारी सुरू होत असल्याचे लक्षात आले. नोकरदार महिलांकडून रात्री ९ वाजेनंतर तयारीला सुरुवात होत असल्याचे समजले. स्वयंपाकाची तयारी करता करता टीव्हीवरील हिंदी व मराठी मालिका बघणाऱ्या गृहिणींची संख्या सर्वाधिक आहे. घरात ज्येष्ठ मंडळी व मुले असतील तर त्यांच्या आवडीनुसार कार्यक्रम अथवा मालिका बघाव्या लागत असल्याचा तक्रारीचा सूरही ऐकायला मिळाला. हिंदी-मराठी वाहिन्यांवर प्राइम टाइममध्ये काही मोजक्या मालिका सोडल्या तर बऱ्याच मालिका रटाळ असल्याचा सूर गृहिणींमधून ऐकायला मिळाला. प्रामुख्याने ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सावर रे’, ‘जावई विकत घेणे आहे’. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दुर्वा’, ‘देवयानी’, ‘मानसीचा चित्रकार तो’ यांसारख्या मालिका रटाळ असल्याचे मत गृहिणींनी व्यक्त केले. कथानकाला मध्येच वेगळे वळण देऊन प्रेक्षकांना झुलवत ठेवण्याच्या प्रकारालाही गृहिणींनी आक्षेप घेतला आहे. वास्तवतेऐवजी कल्पनाविलास जास्त आहे आणि वैचारिकता संपुष्टात आल्याची तक्रार गृहिणींनी केली. अशा रटाळ मालिकांऐवजी महिलांना स्वयंसिद्ध करणारे माहितीपर कार्यक्रम असावेत, अशी अपेक्षा गृहिणींनी व्यक्त केली. प्राइम टाइममध्ये गृहिणींनी हिंदी व मराठी या दोन्ही वाहिन्यांवरील मालिकांना आपली पसंती दर्शविली आहे. त्यात गृहिणींकडून सर्वाधिक पसंती लक्षात आली ती स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेला. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत दाखविल्या जाणाऱ्या ‘महाभारत’ मालिकेची वेळ योग्य असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. सायंकाळचा हा एक तास मोकळा असल्याने ‘महाभारत’ मालिका पाहणे सोपे जाते. त्याच दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता झी मराठीवर आदेश भाऊजींचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम लागत असल्याने बऱ्याचदा रिमोटची ओढाताण होत असल्याची कबुलीही काही गृहिणींनी दिली. स्टार प्लसवरही हिंदीतून ‘महाभारत’ लागते. मराठीत डब केलेले महाभारत स्टार प्रवाहवर दाखविले जाते. स्वस्तिक प्रकाशनच्या महाभारताची तुलना केली जात असली, तरी नव्या पिढीतील गृहिणींमध्ये ‘महाभारत’ मालिकेने सर्वांत वरचे स्थान मिळविले असल्याचे सर्वेक्षणात लक्षात आले. बी. आर. चोप्रा, एकता कपूर आणि आता स्वस्तिक प्रकाशनचे महाभारत पाहणाऱ्या एका ज्येष्ठ गृहिणीने एक मजेशीर बदलही ऐकविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, चोप्रांच्या महाभारतातील गांधारीच्या डोळ्यावर पांढरी पट्टी होती. एकूणच महाभारताचे गारुड कायम असल्याचे लक्षात येते.सर्वेक्षणात गृहिणींचा हिंदी-मराठी मालिकांना संमिश्र प्रतिसाद असल्याचे लक्षात आले. प्रामुख्याने महाभारत, जोधा अकबर, दिया और बाते, ये मोहब्बते, गुस्ताख दिल, महाराणा प्रताप, जय मल्हार, झी मराठीवरील होणार सून मी ह्या घरची, जुळून येती रेशीमगाठी, होम मिनिस्टर, एका लग्नाची तिसरी गोष्ट, देवांचे देव महादेव, दुर्वा या मालिकांना गृहिणींची विशेष पसंती दिसून आली. काही मालिकांची वेळ एकाच वेळी आल्याने गोंधळ होत असल्याचा तक्रारवजा सूरही ऐकायला मिळाला. प्राइम टाइममध्ये टीव्ही बंद असेल अथवा रिमोटचा घरातील अन्य कुणी ताबा घेतला असेल तर अस्वस्थता वाढते आणि घुसमट होत असल्याची भावना बव्हंशी गृहिणींनी बोलून दाखविली. त्यात काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला अथवा भारनियमन असेल तर संतापात भर पडत असल्याचेही सांगण्यात आले. ई टीव्हीवर ‘माझे मन तुझे झाले’ ही मालिका बघितली जाते परंतु तिची दुपारी २ वाजेची वेळ आहे आणि रात्री ८.३० वाजता पुन्हा दाखविली जाते. परंतु रात्री ८.३० वाजता त्याचवेळी झी मराठीवर ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका दाखविली जात असल्याने ‘माझे मन तुझे झाले’ ह्या मालिकेचा भाग पाहता येत नसल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. तीच तक्रार ‘होम मिनिस्टर’बाबतही करण्यात आली आहे. झी मराठीवर दाखविला जाणारा ‘आम्ही सारे खवय्ये’ आणि ई टीव्हीवरील ‘मेजवानी परिपूर्ण किचन’ या पाककृतीच्या कार्यक्रमांनाही गृहिणींनी पसंती दर्शविली आहे. वाहिन्यांवरील लाइव्ह कुकरी शोच्या माध्यमातून विविध रेसीपी दाखविल्या जात असल्याने महिलावर्गात हे कार्यक्रम लोकप्रिय असल्याचे दिसून आले. मात्र, नामवंत शेफचा सहभाग नोंदविताना त्यांनी केवळ अॅँकर म्हणून भूमिका पार पाडण्याऐवजी मार्गदर्शनही करावे, अशी अपेक्षा गृहिणींनी व्यक्त केली. (लोकमत टीम)झी मराठीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’ या दोन मालिकांना गृहिणींची पसंती दिसून आली. जान्हवीचा समजूतदारपणा, श्रीचा प्रामाणिकपणा आणि मेघनाचा निरागस भाव जास्त भावत असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील ‘नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागले तू मला मी तुला’ ह्या गीताच्याही प्रेमात अनेक गृहिणी पडल्या आहेत. काही गृहिणींनी आपली मोबाइलची ट्यून म्हणून हे गीत करून घेतले असल्याचे सांगितले. जान्हवीचे मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाले होते. शहरातील काही सराफी पेढ्यांनी खास जान्हवीचे मंगळसूत्र विक्रीस ठेवले, तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता. जान्हवी विस्मृतीच्या गर्तेतून बाहेर यावी आणि गोखल्यांना त्यांची सून लवकर मिळावी, असाही सूर ऐकायला मिळाला,मालिकांचे विषय बोधपर असावेत महाभारत, जोधा अकबर, दिया और बाती, ये मोहब्बते या मालिका चांगल्या आहेत. दिया और बातीमधील संध्या हे पात्र मला विशेष आवडते. तिच्या अंगातील हुशारी भावते. मालिकांचे विषय बोधपर असावेत. सासू-सुनांची भांडणे, अफेअर्स या गोष्टींवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे असे विषय असलेल्या मालिका पाहवत नाहीत. संपूर्ण कुटुंबाला पाहता येईल असे मालिकांचे विषय असावेत. नीलम पाटीलगृहिणी, कऱ्हाडहलक्या विषयांची मांडणी असावीमालिकांचे विषय हलके-फुलके, तणाव घालविणारे असावेत. सध्या स्टार प्लसवर सुरू असलेले ‘महाभारत’ मी नेमाने पाहते. त्यातील कृष्णाचे पात्र जास्त भावते. अशा ऐतिहासिक-पौराणिक मालिकांतून मुलांनाही ज्ञान मिळते आणि आपल्या संस्कृतीचेही दर्शन घडते. झी मराठीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका पूर्वी पाहत असे. परंतु आता मालिका भरकटत चालली आहे. त्यामुळे बोअर होते. फावल्या वेळेत मी पुस्तकांच्या वाचनावर भर देणे पसंत करते.नीलम कांबळेगृहिणी, मालगाव, ता. वाईजुन्या-नव्यांची सांगड घालावीजोधा अकबर, महाभारत या मालिका मला पाहायला आवडतात. ऐतिहासिक-पौराणिक मालिकांमधील विचार, ज्ञान आपल्याला अधिक प्रगल्भ करतात. घरकाम सांभाळून मी टीव्ही पाहते. मालिकांमधून लोकशिक्षण झाले पाहिजे. मुलांवर संस्कार करणाऱ्या मालिका, कार्यक्रम असावेत. जुन्या-नव्यांची सांगड घालणारे विषय मांडावेत. मराठी मालिका पाहते परंतु त्यांचा दर्जा पाहिजे तसा नाही. - धनश्री बोधेबोधेवाडी, ता. कोरेगाव महिलांविषयी नकारात्मकता अधिकमी मुळातच एक कलावंत असल्याने वेगवेगळ्या मालिकांचे निरीक्षण सुरूच असते. सध्या काही चांगल्या मालिका सुरू आहेत. त्यातून नक्कीच बोध घेण्यासारखे आहे. मी ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आवर्जून पाहते. कारण या कार्यक्रमात तळागाळातील महिलांनाही स्थान दिले जाते. मात्र, काही मालिकांबाबत माझा आक्षेप आहे. त्यात महिलांनाच खलनायक ठरविले आहे. महिला म्हणजे कट-कारस्थान अशीच नकारात्मकता अधिक दाखविली जाते. प्रबोधनापेक्षा व्यावसायिकता अधिक वाढली आहे. जे वास्तव नाही ते दाखविले जाते. मला ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका जास्त आवडते. कारण या मालिकेतील पात्रांमध्ये एक सहजता आहे. त्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो. प्राजक्ता माळी अर्थात मेघनाचे पात्र मला अधिक भावले. आदित्य व मेघना हे पात्र नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतात. करमणूक करता करता विचार देणाऱ्याही मालिकांची निर्मिती होणे गरजेचे आहे. मालिकांमधील घटनांचा संबंध महिला आपल्या आयुष्याशीही जोडू पाहते. त्यातून काही दुर्घटनाही घडू शकतात. त्यामुळे मालिका निर्माता व लेखकांनी त्याचेही भान ठेवले पाहिजे. विद्या पवारसातारा
गोजिरवाण्या घरात, मालिकांची वरात..!
By admin | Updated: July 17, 2014 23:17 IST