विश्वनाथन जगन्नाथन (वय ३३, रा. वेलामपट्टी, अथूर-तामिळनाडू) व सुब्बराम सिरंगराम आर (वय ३६, रा. विसू वसापुरम, आम्मापट्टी, तामिळनाडू) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेला मालट्रक (क्र. केएल ०८ बीक्यू ४०३०) रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खोडशी गावच्या हद्दीतील हॉटेल अरोमासमोर थांबला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनरची (क्र. टीएन ६० एझेड ०८७१) मालट्रकला जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरमधील चालक आणि क्लिनर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकून पडले होते.
अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत जाधव हे कर्मचाऱ्यांसह तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमींना कंटेनरच्या केबिनमधून बाहेर काढून उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, महामार्गावर रात्रीच्या वेळी अंधारात मालट्रक उभा करून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी मालट्रकचा चालक ए. के. सुनीलन (वय ५१, रा. आतीकवील हाऊस, ता. पुमंगलम, केरळ) याच्यावर कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार प्रशांत जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.