परळी : जिल्ह्यात कोठेही मंत्र्यांचे, राजकीय नेत्यांचे दौरे असल्यास त्यांच्या दिमतीला हेलिकॉप्टर असतात. मात्र, त्यांच्या विमान, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झालाच तर लगेचच दुसरे विमान त्यांच्यासाठी उपलब्ध होते. परंतु देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानास वीर मरण आल्यास त्यांचे पार्थिव आणण्यास हेलिकॉप्टर का उपलब्ध होत नाही, असा संतप्त सवाल जवान नितीन लोटेकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.कुस बुद्रुक येथील वीर जवान नितीन लोटेकर यांचे पार्थिव येण्यास तब्बल तीन दिवस लागले. त्यामुळे लोटेकर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमच्या बाबतीत असे घडले, मात्र इतर कोणाच्या बाबतीत असे घडू नये, असेही त्यांनी सांगितले. लोटेकर यांचा ९ जुलै रोजी सकाळी १०.४० वाजता उपचारादरम्यान राजस्थान (जोधपूर) येथे मृत्यू झाला होता. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उशीर झाला, असे अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले. परंतु तेव्हापासून ते जवानाचे पार्थिव गावी येईपर्यंतचे त्यामधल्या काळातील ४१ तास त्यांच्या कुटुंबीयानंी वाट पाहिली. प्राणाची तमा न बाळगता देशसेवा करणाऱ्या जवानांची वीर मरण आल्यानंतर तरी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. (वार्ताहर)
नेत्यांच्या दिमतीला हेलिकॉप्टर; जवानाचे पार्थिव मात्र उपेक्षित
By admin | Updated: July 13, 2014 22:25 IST