सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून, जोर धरू लागला आहे. कोयनेत प्रथमच आवक होऊ लागली आहे. तर साताऱ्यात रिमझिम स्वरूपात पाऊस होत असून पूर्वेकडील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात या वर्षी वेळेच्या अगोदर माॅन्सूनचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला काही दिवस पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. विशेष करून धरण क्षेत्रात पाऊस चांगला पडत आहे. यामुळे सध्यस्थितीत तरी कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ३०७८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर इतर प्रमुख धरणांत अजून आवक सुरू झालेली नाही.
त्याचबरोबर सातारा शहरात मंगळवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरूपात पाऊस होत आहे. बुधवारीही पाऊस झाला. यामुळे नागरिकांना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागत होते.
पूर्व भागात काही भागांत रिमझिम पाऊस झाला. पण, बहुतांशी भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुष्काळी भागात खरीप हंगाम पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. सध्या पेरण्या रखडल्या आहेत.
चौकट :
कोयनेला ५३ मिलिमीटर पाऊस...
पश्चिम भागातील धरण परिसरात पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वाधिक ५३ मिलिमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत ऐकूण १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर कण्हेरला ३१ तर एकूण ८९ मिलिमीटर पाऊस झाला. धोमला १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनपासून धोम धरण परिसरात ७२ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. बलकवडीला बुधवारी सकाळपर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत १०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर तारळीला २५ आणि जूनपासून ९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. खटाव तालुक्यातील येरळा धरण परिसरात अवघ्या ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
.......................................................