पाटण : सातारा जिल्ह्याच्या सर्वच भागांतील पावसाचा जोर ओसरला असून, तारळी वगळता सर्वच धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. कोयनेमध्ये अवघे ४९.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.सातारा जिल्ह्यात यंदा चक्क जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. जून महिना कोरडा गेल्याने सातारकरांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाने सलग आठ दिवस झोडपून काढल्यामुळे मागच्या महिनाभराची कसर भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, गुरुवारपासून पावसाचा जोर मंदावला. गेली दोन दिवस कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर होता; मात्र शनिवारपासून कोयनेतही पावसाने दडी मारली. कोयना पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. कोयनेत सध्या ४९.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी एक हजार मिलीमीटर कमी पाऊस झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : कोयना ५२, नवजा ६६ तर महाबळेश्वर ५६. जिल्ह्यातील धरणांतील दि. २६ अखेर झालेला पाणीसाठा कंसात क्षमता : कोयना ४९.९० (१०५.२९), धोम ६.४१ (१३.५०), कण्हेर ६.८६ (१०.१०), भाटघर ९.२१ (२३.७५), वीर ४.४८ (९.८३), उरमोडी ७.९३ (९.८०), धोम-बलकवडी २.५१ (४.०८), तारळी ४.९० (५.८५). (प्रतिनिधी)
तारळी वगळता सर्व धरणांत निम्मेच पाणी
By admin | Updated: July 27, 2014 00:20 IST