कऱ्हाड : ‘उसाला ३१०० रुपये प्रतिटन भाव द्या; अन्यथा येत्या दहा दिवसानंतर संपूर्ण राज्यभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून असहकार आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी रस्त्यावर उतरू, त्याची सुरुवात आजच्या मोर्चाने करण्यात आली आहे,’ असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला.संघटनेच्या वतीने आज येथील टाऊन हॉलपासून बसस्थानक, दत्त चौकमार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, राज्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रवर्तक बी. जी. पाटील, राज्य उपाध्यक्ष नितीन बागल, नितीन पाटील, पाशा पटेल, शंकरराव गोडसे, लक्ष्मण वडले, संजय पाटील, चंद्रकांत यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेच्या नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर जोरदार आगपाखड करण्यात आली. ‘राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत केंद्रातील व राज्यातील सत्तेत सहभागी असल्याने आता ऊसदराबाबत बोलायला तयार नाहीत,’ असे सांगतानाच ‘बळीराजा’च्या नेत्यांनी त्यांची खिल्लीही उडविली. ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांच्या संपत्तीचा विषयही काही नेत्यांनी या वेळी उपस्थित केला. ‘बळीराजा’ ही अराजकीय संघटना असून, उसाला योग्य दर मिळेपर्यंत संघटना आंदोलन थांबविणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये : पंजाबराव पाटीलविदर्भ आणि मराठवाड्यातून आजकाल केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्याच बातम्या ऐकायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता लढण्यास सज्ज व्हावे. संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आवाहन अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे निर्देश करून ‘हेच का अच्छे दिन,’ असा सवालही त्यांनी केला.
३१०० रूपये भाव द्या; अन्यथा आंदोलन
By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST