कुडाळ : जावळी तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर भागातील भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडी या गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या गावांच्या डोंगर उतारावर भूस्खलन झाले होते. नुकतेच भूगर्भ शास्त्रज्ञांच्या टीमने या गावांना भेटी देऊन पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे या भागात दरडी कोसळल्या होत्या, ओढ्या-नाल्याचे प्रवाह बदलले होते. यामुळे मोठ-मोठे दगड नदी, ओढ्याजवळील शेती पात्रात जमा झाले. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील लोकांना उदरनिर्वाहाचे एकमेव साधन शेती असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या गावांचे पुनर्वसन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
या भागात झालेल्या भूस्खलनाची कसे झाले, याची पाहणी नुकतीच केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी या पथकाला माहिती दिली. यावेळी मंडलाधिकारी ए. आर. शेख, तलाठी मकरध्वज डोईफोडे, भुतेघर, वाहिटे, बोंडारवाडी गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.