साताऱ्यातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्याच्या मध्ये शोभेची झाडे लावण्यासाठी दुभाजक तयार केला आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला आहे. त्यामुळे पर्यावरणाला ऱ्हास पोहोचत आहे. त्याची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. (छाया : जावेद खान)
००००००
रस्ता दुरुस्तीची गरज
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
००००
कर्जमर्यादेत वाढ
कुडाळ : जावळी तालुक्यातील पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांना द्यावयाच्या कर्जमर्यादेत वाढ केली असल्याचे सहायक निबंधक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. १५ हजार मासिक वेतन घेणाऱ्यांसाठी ५ लाख यापासून पुढे टप्प्या-टप्प्याने साठ हजार वेतन घेणाऱ्यांसाठी ५० लाखांची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
००००००
डायऱ्यांना मागणी
सातारा : सरत्या वर्षाला निरोप देत असताना नोकरदारांमधून नवीन वर्षाची डायरी घेण्यासाठी लगबग सुरू होत असते. त्यामुळे साताऱ्यातील बाजारपेठेतही विविध आकारांतील प्रकारातील डायऱ्या विक्रीसाठी आल्या आहेत. त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग वाढली आहे.
०००००००
शाळा अद्यापही बंदच
सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकविले जात आहे. त्यामुळे मुलं घरात आहेत. सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी इतर वर्ग कधी सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
०००००
मुलं मोबाईलमध्ये मग्न
सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक पालकांनीही त्यांच्यासाठी स्वतंत्र मोबाईलची सोय केली आहे. शिक्षणाशिवाय इतर वेळीही ही मुलं मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
०००००००
म्हसवे-बोराटे वस्ती रस्त्यावरील खड्डे मुजवावेत
कुडाळ : पाचवड कुडाळ रस्तावरील म्हसवे ते बोराटे वस्तीदरम्यान खड्डे बांधकाम विभागाने मुजवले नाहीत. या मार्गाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र, पाचशे मीटर अंतरातील काम रेंगाळलेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट राहिलेल्या या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती व्हावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
०००००००
सुगडीत लगबग
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यातील सर्वच भागांत सुगडी बनविण्याची लगबग वाढली आहे. मकर संक्रांत काही दिवसांवर आलेली असल्याने या व्यवसायातील कारागिरांच्या कामांनी वेग घेतला आहे. सुगडी भाजणे, रंगवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये तरुणाईही सहभागी होत आहे.
०००००
सॅनिटायरचा वापर
सातारा : कोरोनानंतर नववी, दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी शाळेत येत आहेत. एकमेकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शाळेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. शाळेच्या प्रवेशद्वारातच सेवकाला सॅनिटायझरची बाटली घेऊन बसविले जाते.
०००००
मद्यविक्रीस बंदी
सातारा : ग्रामपंचायत निवडणूक लागलेली असून गुरुवारी (दि.१५) मतदान होत आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी, गुरुवारी (दि. १५), आदल्या दिवशी बुधवार (दि.१४) तसेच मतमोजणीच्या दिवशी शुक्रवार (दि. १६) रोजी मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे पालन करण्याची मागणी होत आहे.
०००००००००
पूल दुरुस्तीची मागणी
सातारा : बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यावर असलेल्या आर्याग्ल कॉलेजलगतच्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देण्यात आले आहे.
००००००
पिके धोक्यात
वडूज : खटाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पिकांवर रोग पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हाती काही पडेल की याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
०००००
पर्यटकांची संख्या कमी झाली
सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कास, बामणोली, पाचगणी, कोयनानगर आदी भागांत गेल्या आठवड्यात नाताळच्या सलग सुट्या तसेच सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. आता सुट्ट्या संपल्या असल्याने पर्यटक आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळे ओस पडल्याचे जाणवत आहे.
००००००००
बेशिस्त वाहनतळ
सातारा : साताऱ्यातील तहसील कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालयाच्या दारातच वाहने बेशिस्तपणे लावलेली असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहनांसाठीही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वारंवार घडत असते. त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
००००००
कठडे तुटल्याने धोका
पाचगणी : पाचगणी परिसरातील अनेर रस्ता घाटमाथ्याचा आहे. त्यातील अनेक ठिकाणचे कठडे ढासळले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या कठड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून वारंवार केली जात आहे.
००००००
यवतेश्वर घाटात कचऱ्याचे साम्राज्य
पेट्री : शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर घाट परिसरात मोठ्या प्रमाणावरील काचा, कागदी बोळे, प्लास्टिक पिशव्याचा कचऱ्याचे ढीग साठले आहेत. त्यामुळे निसर्गरम्य यवतेश्वर घाटाचा श्वास घाणीत घुटमळू लागल्याने या ठिकाणांला स्वच्छतेची प्रतीक्षा लागली आहे. या परिसरात बहुसंख्य पर्यटक फिरायला येतात. काहीजणांकडून घाटाच्या खालील बाजूस कचऱ्याच्या पिशव्या झाडांवर टाकलेल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीमुळे निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.