मलकापूर : ‘कऱ्हाड दक्षिणमधील अनुभवाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्याने आजपर्यंत वाममार्ग व धनदांडग्यावरच टीका केली. अशा धनदांडग्यांबरोबरचं मैत्रीपर्व करूनच उंडाळकरांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांची फसवणूक केली. अशा वेळेनुसार बदल्या राजकारणाला जनता वैतागली आहे. दक्षिण कऱ्हाडमध्ये राष्ट्रवादीला सर्वसामान्यांचा नेता म्हणून अविनाश मोहितेंच्या रूपाने सच्चा माणूस मिळाला आहे. भविष्यात अशा राजकारणाचा राष्ट्रवादीच अंत करेल,’ असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.मलकापूर येथे आयोजित राष्ट्रवादीच्या सुसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश मोहिते, राजेश पाटील-वाठारकर, पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, जयंतकाका पाटील, सदस्या सुरेखा शेवाळे, अशोकराव थोरात, राजकुमार पाटील, समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, पांडुरंग चव्हाण, नितीन भोसले, शहाजीराव पाटील, पोपटराव साळुंखे, नंदकुमार बटाणे, डॉ. अजित देसाई, पोपटराव जाधव, अॅड. दीपक थोरात, अमोल चव्हाण, मिना बोरावके, विजयाताई पाटील उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिणेत विंग येथे राष्ट्रवादीने मेळावा घेतल्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे. मी संघटना करणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. नुरा कुस्तीवाल्या पैलवानांनी माझ्या नादाला लागू नये, नाहीतर चितपट व्हाल.’ असा टोलाही त्यांनी लगावला.अविनाश मोहिते म्हणाले, ‘मी राजकारण व समाजकारणाची सुरुवात चुकीच्या माणसांबरोबर केली. जे वाममार्गाची भाषा करत होते. त्यांनीच वाममार्गाची कास धरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गावात शाखा व घराघरात कार्यकर्ता निर्माण करणार आहे.’‘दिवंगत बापूंनी दक्षिणेत राष्ट्रवादीचे काम एकनिष्ठेने केले. ताकत कमी होती. अविनाश मोहितेंच्या रूपाने आता ताकत वाढली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येतील,’ असे मत राजेश पाटील-वाठारकर यांनी व्यक्त केले. अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. (प्रतिनिधी)मोदी सरकारचा दुष्काळाऐवजी जाहिरातीवर खर्चराज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी ३५ सभा घेणाऱ्या मोदींना दुष्काळी मराठवाड्यात एकदाही वेळ मिळाला नाही. भांडवलदारांशी पायघड्या घालणाऱ्या सरकारने दुष्काळी जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी जाहिरातीवर दीड हजार कोटी रुपये खर्च केला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.उत्तरेतून सुरुवात... उत्तरेतून शेवटकऱ्हाड दक्षिणेतील एक ज्येष्ठ नेते स्वत:च्या राजकारणाची वाटचाल उत्तरेतून झाली असल्याचे वारंवार सांगतात. आजपर्यंत धर्मांध व वाममार्गाच्या पैशावर बोलणाऱ्या या नेत्याने अशा लोकांचीच संगत धरली आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांवर प्रेम करणाऱ्या जनतेने त्यांच्या राजकारणाचा उत्तरेतूनच शेवट केला असल्याची बोचरी टीका या मेळाव्यात करण्यात आली.
वाममार्गावर बोलणाऱ्यांचे धनदांडग्यांबरोबर मैत्रीपर्व
By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST