कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी दुभाजक उभारले जात आहेत. कऱ्हाडनजीकच्या वारुंजी फाट्यापासून सुपने गावापर्यंत रस्त्यावर साईडपट्ट्यांना पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. काही अंतराच्या एका लेनचे काम अद्याप बाकी आहे. ते कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
सह्याद्री कारखान्यासमोर पथदिव्यांचा उजेड
मसूर : कऱ्हाड-मसूर रस्त्यावर सह्याद्री कारखान्यासमोरील रस्त्यावर पथदिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील परिसर उजळून निघाला आहे. कारखान्यासमोरील परिसर सातत्याने गजबजलेला असतो. त्यामुळे तेथे पथदिवे बसवणे आवश्यक होते. तेथे बसविण्यात आलेल्या पथदिव्यांमुळे रात्रीच्या वेळी पादचारी आणि सायकलस्वारांसह ग्रामस्थांचीही चांगली सोय झाली आहे. कऱ्हाड-मसूर हा रस्ता वर्दळीचा आहे. तसेच कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर गेट परिसरात मजुरांसह कारखान्यातील कामगार, ट्रॅक्टर चालकांची रहदारी असते. अशा परिस्थितीत याठिकाणी पथदिवे नव्हते. त्यामुळे धोकादायक परिस्थिती होती. सध्या दिवे बसविल्याने परिसर उजळला आहे.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
शामगाव घाटातील सुरक्षा कठडे ढासळले
शामगाव : येथील घाट अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. या घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शामगाव घाट एकेकाळी लूट, मारामारीसाठी बहुचर्चित होता. कालांतराने हे प्रमाण कमी झाले. मात्र, सध्या या घाटातील संरक्षक कठड्यांच्या वारंवार होणाऱ्या पडझडीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घाटातील संरक्षक कठडे तुटल्यामुळे काही सामाजिक संघटनांनी यावर आवाज उठवला होता. त्यानंतर पडझड झालेल्या कठड्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, मध्यंतरी वारंवार वाहनांच्या धडकेत कठड्यांची मोडतोड झाली आहे.
नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलधारक त्रस्त
कऱ्हाड : येळगाव (ता. कऱ्हाड) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येवतीसह संपूर्ण विभाग अनेकदा आऊट ऑफ कव्हरेज होत असल्याने येथील इंटरनेटद्वारे केली जाणारी अनेक कामे खोळंबत आहेत. कऱ्हाड दक्षिण विभागातील डोंगरी विभाग म्हणून येवतीसह येळगाव परिसराची ओळख आहे. या परिसरातील ग्राहकांकडे मोबाईल असूनही सध्या वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने मन:स्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटअभावी बँकेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठविणे आदी कामे करता येणे मुश्किल बनत आहे.
ढेबेवाडी मार्गावर धोकादायक वळण
कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणांपैकी शिंंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. या वळणावरून भरधाव वाहनांवरील चालकांचा ताबा सुटून वाहने नजीकच्या ओढ्यात जात आहेत. या ठिकाणी दिशादर्शक व सूचना फलक नाहीत. फलक लावण्यात आले नसल्याने रात्रीच्यावेळी दुचाकी वाहनांमध्ये अपघात होत आहेत.