मलकापूर : शहरातील नगरिकांना वारंवार सूचना देऊनही रस्त्याकडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढतच आहे़ यापुढील काळात रस्त्याकडेला किंवा सार्वजनिक जागेवर कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय येथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे़ या मोहिमेची पूर्वसूचना म्हणून नगरपंचायतीने सुमारे ४०० जणांना नोटिसा दिल्या आहेत़ मलकापूर शहरातील काही भागात स्वच्छतेबरोबर नागरिकच दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे़ दोन्ही उपमार्गालगतचे व्यावसायिक व काही नागरिक घरातील कचरा राजरोसपणे रस्त्याकडेलाच टाकत आहेत़ वारंवार सूचना देऊन किंवा वेळोवेळी घंटागाडी व कचरा गोळा करण्यासाठी वाहने फिरत असतानाही कचरा रस्त्याकडेलाच टाकला जातो़यावर प्रतिबंध म्हणून कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नगरिकांमधून होत आहे़ याचा विचार करून महामार्गाच्या दुतर्फा असणारे व्यवसायिक व नागरिक, मोरया कॉम्प्लेक्स परिसर व झेड़ पी़ कॉलनी परिसरातील सुमारे ४०० नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत़ यापुढील काळात उघड्यावर व रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मलकापूर नगरपंचायत प्रशासनाने घेतला आह़े़ (प्रतिनिधी)कारवाईचा निर्णय स्तुत्य शहरातील दोन्ही उपमार्ग व कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यांवर सकाळी फिरायला येणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मात्र रस्त्याकडेला ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढीग असतात़ यामध्ये अनेक हॉटेल व्यवसायिक उरलेले अन्न टाकतात़ त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते़ याशिवाय अशा ठिाकणी कुजलेले अन्न खाण्यासाठी कुत्र्यांच्या झुंडी जमा होतात़ मोकाट कुत्र्यांचाही फिरणाऱ्यांना उपद्रव होतो़ त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय स्तुत्य आहे़, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे़स्थानिक प्रशासनाच्या वतीने कचरा गोळा करण्यासाठी पाच घंटागाड्या व दोन ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे़ मात्र, काही ठिकाणी आजही कचरा रस्त्याकडेला टाकला जातो़ वारंवार प्रबोधन करूनही काही नागरिक व व्यवसायीक आडमुठे धोरण स्वीकारतात़ म्हणून यापुढे कचरा उघड्यावर किंवा रस्त्यावर टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत़ - राजेंद्र तेली, मुख्याधिकारी
रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी
By admin | Updated: December 2, 2014 21:28 IST