परळी : फक्त सहा गुंठे शेती... घरात सहा माणसे... शेतात कष्ट करून संसार उभा केला... संसार करुन दोन मुलींची लग्नं केली... मात्र, चांगले दिवस येत असल्याचे नियतीला मान्य नव्हते... शुक्रवारी घराला शॉर्टसर्किटने आग लागून आठ लाखांचे नुकसान झाले अन् क्षणात संसाराची राखरांगोळी झाली. ठोसेघर पठारावर छोटेसे पांगरे हे गाव आहे. या गावातील अनेक लोक व्यवसायासाठी पुणे, सातारा, चिपळूण, ठाणे येथे स्थायिक आहेत. गावात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोक राहतात. जमिनी भरपूर असल्याने गावातील बैल असणार्या लोकांना खंडाने, वाट्याने जमिनी दिलेल्या. त्यातीलच एक येथील हरिबा गोविंद जाधव हे यांच्या स्वत:ची मालकी जमीन फक्त सहा गुंठेच परंतु घरामध्ये आई, दोन मुली, एक मुलगा, पत्नी यांना सांभाळण्याची जबाबदारी यांच्यावरच. त्यामध्ये त्यांच्या मुली लग्नाला आलेल्या. उत्पादनाचे साधन फक्त शेती व घरामध्ये असणार्या तीन गाई, तीन म्हैशी यांच्या दुधाच्या आधारावरच. परंतु खचून न जाता गावातील लोकांच्या जमिनी वाट्याने, खंडाने करून दिवस-रात्र मजुरीची कामे करून घर चालवत असे. त्यातच बचत करून दोन्ही मुलींची लग्न थाटामाटात लावून दिली. दिवसेंदिवस शेतीच्या कष्टातून त्याचे चीज मिळू लागले आणि जाधव यांच्या संसाराची गाडी वेग पकडू लागली होती. त्यामुळे त्यांनी तीन गाई, तीन म्हैशी, तीन बैल, काही शेळ्या असा संसार उभारण्यास सुरुवात केली. मात्र, जाधव यांच्या संसारात चांगले सुखाचे दिवस येतायेत हे नियतिला मान्य नव्हते. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास शॉर्टसर्किटने त्यांच्या डोंगराएवढा उभा केलेल्या संसाराची जागीच राख झाली. त्यामुळे कष्ट करून केलेले पंचवीस पोती गहू, दहा पोती तांदूळ, दोन पोती ज्वारी, सोने, सुमारे आठ हजार गवत, लाकूडफाटा आदींचे सुमारे आठ लाख रुपये नुकसान झाले. हरिबा जाधव यांनी गेल्या तीस वर्षांत उभ्या केलेल्या संसाराची एका क्षणातच राखरांगोळी झाली. हरिबा जाधव यांनी गेल्या तीस वर्षांत उभा केलेला संसार, बचत करून खरेदी केलेल्या वस्तूंची त्यांच्या डोळ्यांसमोरच क्षणात राख झाली. यावेळी हरिबा जाधव व त्यांच्या कुटुंबाने केलेला आक्रोश हा काळीज पिळवटून टाकण्यासारखा होता. (वार्ताहर)
घराला लागलेल्या आगीने क्षणात संसाराची राखरांगोळी
By admin | Updated: June 2, 2014 01:19 IST