वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी भाटकी, गंगोती, पुकळेवाडी, इंजबाव, वाकी, हावलदारवाडी, मोही, मार्डी, थदाळे, जाशी, तोंडले, टाकेवाडी, स्वरूपखानवाडी, लोधावडे या १४ गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी, उर्वरित ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही गावात तिरंगी लढत होत असल्याने, टोकाचे राजकारण होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्षांनी एकत्र येत भाजपासमोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून अनेक सत्ता काबीज केल्या असून, सध्या माणमधील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यासाठी १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार असून, गटा-तटाने खेळल्या जाणाऱ्या राजकीय आखाड्यात यंदा मात्र भाजपाविरोधात महाविकास आघाडीचीच रस्सीखेच रंगणार असल्याचे निदर्शनास येत आहे.
अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या आणि टोकाचे राजकारण खेळणाऱ्या देवापूर, कुकुडवाड, काळचौंडी, शिंगणापूर गावांंमध्ये मतदानासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कुरघोड्यांचे राजकारण करून गावकीकरिता गावपातळीवरील संघर्ष भाव-भावकीत पेटणार आहे.
चौकट:
ऊसतोड मजुरांच्या निर्णायक मतदानासाठी गावनेत्यांची लगबग !
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून, रणधुमाळीला वेग आला आहे. एकेक मत सुद्धा महत्त्वाचे असून, त्यासाठी गावोगावचे पॅनेलप्रमुख, उमेदवार यांनी कंबर कसली आहे. निवडणूक ताकदीने लढविण्याची तयारी करत आहेत. त्यातील काही चाणाक्ष पॅनेलप्रमुख, ऊसतोडणीस गेलेल्या कर्नाटक, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील मजुरांना भरमसाट खर्च करून गावी आणून त्यांचे निर्णायक मत आपल्या पारड्यात कसे पडेल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे.