खंडाळा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, यासाठी लाखो समाजबांधव भर पावसातही बारामतीत तळ ठोकून आहेत. कित्येक दशकांचा अन्याय विधानसभेच्या तोंडावर आग ओकू लागला आहे. यामुळे एकीकडे तीव्र आंदोलन तर दुसरीकडे मंत्रालयात सर्व मंत्र्यांच्या भेटी आणि चर्चा यामुळे धनगर समाजाच्या या आंदोलनाने निर्णायक वळण घेतले आहे. ‘आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळविणारच,’ असा दृढनिश्चय करून महाराष्ट्रातून एकवटलेल्या धनगर समाजाने योग्य निर्णय न झाल्यास आघाडी सरकारचेच ग्रह फिरविण्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या आंदोलनात खंडाळा तालुक्यातील शेकडो तर जिल्ह्यातील हजारो समाजबांधवांनी सहभाग घेतला आहे. आरक्षणाच्या मागणीचा पहिला आवाज हा खंडाळा तालुक्यातील तहसील कचेरीवर काढलेल्या मोर्चापासून झाला. बारामतीच्या आंदोलनाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बरसणाऱ्या पावसाची तमा न बाळगता हे आंदोलनकर्ते आरक्षणाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. पक्षभेद आणि संघटना विसरून केवळ समाजावर आजतागायत झालेल्या अन्यायाला वाचा फोडून अवघा समाज एकवटल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातून या समाजाचे नेतृत्व करणारे शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष टी. आर. गारळे, खंडाळा पंचायत समितीचे सदस्य रमेश धायगुडे-पाटील, कऱ्हाडचे रमेश लवटे यांनी गुरुवारी रामराजे नाईक-निंबाळकर आणि बाळासाहेब थोरात, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची मंत्रालयात भेट घेऊन आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यामुळे एकीकडे तीव्र आंदोलन तर दुसरीकडे मंत्र्यांच्या गाठीभेटी असे दुहेरी दबाव सरकारवर आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाने यावेळी योग्य निर्णय न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत शासनाविरोधी मतदान करण्याची लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे सरकार आदिवासींची आरक्षण टक्केवारी अबाधित ठेवून सवलती जाहीर करणार की, आहे त्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषण जरी बारामतीत असले तरीही सातारा जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)अनुसूचित जमातीचे आरक्षण हा धनगर समाजाचा न्याय हक्क आहे. गेली साठ वर्षे आमच्यावर अन्याय झाला आहे. आजपर्यंत शांत बसलेला हा समाज जागृत झाला आहे. केवळ शब्दांच्या खेळात सवलतींपासून समाजाला दूर राहावे लागले आहे. त्यामुळे काही झाले तरी आरक्षण आम्ही मिळवूच. त्यासाठी कितीही मोठा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.- रमेश धायगुडे-पाटीलसदस्य जिल्हा नियोजन मंडळभारतीय घटनेत धनगर समाजाला एसटीच्या सवलती दिल्या आहेत. केवळ राज्य शासनाने त्या लागू केल्या नाहीत. आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीररीत्या कोणतीही अडचण वाटत नाही. त्यामुळे शासन योग्य निर्णय घेईल, तसे न झाल्यास समाजाच्या वतीने सुप्रिम कोर्टात लढण्याची सर्वांचीच मानसिकता आहे. समाजाला न्याय मिळण्याची हीच योग्य वेळ आहे.- अॅड. सचिन धायगुडे
उपोषण बारामतीत;अस्वस्थता साताऱ्यात
By admin | Updated: July 25, 2014 22:16 IST