नितीन काळेल सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. तसेच पावसामुळे १० हजार क्षमतेच्या वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी, अशी सूचना ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, निरा दत्त घाट पालखी तळांची पहाणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. या पाहणीप्रसंगी आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपायुक्त तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पालखी मार्गावर पाऊस पडत आहे. या पावसापासून वारकऱ्यांचा बचाव होण्यासाठी १० हजार क्षमतेच्या वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी. तसेच वारकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मोबाईल स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. पालखी पुढील गावात जाईल तसेच मागील गावांत स्वच्छता ठेवावी. वीज कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी तळावर हायमास्क दिवे लावावेत. तसेच बेकायदा वीज जोडणी घेतली जावू नये यासाठी पोलिस आणि वीज कंपनीने पथक तयार करावे. बेकायदा जोडणी तोडून टाकावी. कायदेशीर वीज कनेक्शन्स द्यावीत.
आरोग्य विभागाने पालखी मार्गात वैद्यकीय पथके तैनात करावीत. वारकऱ्यांसाठी गॅस व केरोसीन पुरविण्यात यावे. अन्न व औषध प्रशासनानेही अन्न पदार्थ तपासणीसाठी पथक तैनात करावे. वेळोवेळी वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करावी. रस्त्यांची सुरु कामे ताडीने पूर्ण करावीत. त्याचबरोबर जी कामे पूर्ण होणार नाहीत, अशा ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही मंत्री गोरे यांनी केली.
गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही अन् ड्रोन
पालखी सोहळ्याला गर्दी होते. यासाठी पोलिस विभागाने पालखी मार्गावरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभा करावेत. चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केल्या.