पाचवड : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ आणि आरोग्य सेवेत क्रांती करणारे माय लॅबचे संस्थापक हसमुख रावल यांना ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार पुरस्कारार्थींना त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे,’ अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
मदन भोसले म्हणाले, ‘कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ २५ वर्षांपासून ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे पंचवीसावे वर्ष आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान व्हावा या उद्देशाने ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ सुरू केला आहे. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रती केलेल्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या भावनेतून त्यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर हसमुख रावल यांनी सर्वसामांन्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्याच्या ध्यासातून केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासोबत देशातील पहिल्या स्वदेशी कोरोना आरटी पीसीआर टेस्ट किटची यशस्वी निर्मिती करून या बिकट परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्याचा गौरव आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी प्रा. संभाजीराव पाटणे, प्रा. वसंतराव जगताप, अनिल जोशी, उपराकार लक्ष्मण माने, प्रल्हादराव चव्हाण, प्रा. रमेश डुबल आणि प्रताप देशमुख यांची समिती स्थापन केली होती.