रामापूर : आघाडी सरकारच्या माध्यमातून योग्य पाऊल पुढे टाकणे गरजेचे होते; मात्र ते न झाल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाचे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. मराठा समाजाचा अंत पाहू नये. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात हे आंदोलन सुरू झाले तर सरकारमधील आमदार व मंत्र्यांना तालुक्यातील लोक फिरू देणार नाहीत, असा इशारा देऊन लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करावा, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पाटण येथे व्यक्त केले.
मराठा आरक्षणावरील स्थगिती थांबून मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मिळावे, त्याचबरोबर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भरतीप्रक्रिया स्थगित करावी आदी मागण्यांसाठी पाटण तालुका मराठा समाजाच्या वतीने पाटण तहसील कार्यालयासमोर बेमुदत राज्यव्यापी साखळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी माथाडी नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
नरेंद्र पाटील म्हणाले, हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही; पण आम्ही मराठा आहोत. आमच्या मराठा बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. पक्षीय राजकारणापेक्षा आपण समाजाच्या बाजूने उभे राहावे. प्रत्येक समाज हा मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा आहे? मग सरकारला अडचण कोणती आहे, असा सवाल करून मराठा आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. तरी या आंदोलनाचा सकारात्मक दृष्टिकोनातून सरकारने विचार करावा.
यावेळी नितीन पिसाळ व संजय इंगवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांना मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, आधी घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात यशवंतराव जगताप, लक्ष्मण चव्हाण, शंकरराव मोहिते, संजय इंगवले, नितीन पिसाळ, मंगेश पाटणकर, नगराध्यक्ष अजय कवडे, पवन तिकुडवे, गणेश पवार, प्रमोद पवार, अभिषेक नायकवडी, अर्जुन सत्रे, विजय देसाई, तुषार शेजवळ, संतोष इंदुलकर, राहुल देसाई, राजाराम मोटे यांच्यासह मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
फोटो -