लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीमुळे विकासकामांवर परिणाम झाला आहे. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक सकारात्मक आणि परिणामकारक काम दिसेल, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी शनिवारी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण केले. आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, मागील जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडी झाल्या आणि पुढच्या दोन महिन्यातच कोरोनाचा कहर माजला. विकास कामावर खर्च करण्यात येणारा बहुतांश निधी कोरोना महामारी उपाययोजनांमध्ये खर्च करावा लागला. त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम झालेला आहे. जिल्हा परिषद सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांना काम करताना अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला अधिकचा निधी मिळावा, अशी मागणी या बैठकीमध्ये सदस्यांनी केली. या अनुषंगाने आम्ही अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. याचे सकारात्मक परिणाम निश्चितपणे भविष्य काळामध्ये पहायला मिळतील.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीबाबत नाराजी व्यक्त केली जात असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता पालकमंत्री म्हणाले, अशी कुठलीही तक्रार या बैठकीत आली नाही. मात्र, पक्षाच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या तसेच सदस्यांच्या बैठका वारंवार घेतल्या जात होत्या. मात्र, कोरोनामुळे त्यावर निर्बंध घालावे लागले. जिल्हा परिषदेची बैठक घेण्याआधी पार्टी मीटिंग घेण्याची पद्धत होती. मात्र, कोरोना काळात ती खंडित झालेली आहे. या बैठकीमुळे विकासकामांच्या अनुषंगाने सभागृहात विचारायचे प्रश्न तसेच इतर बाबींबाबत सविस्तर चर्चा होत असे. मात्र सध्या तसे होत नाही. आता याबाबत पक्षाने अधिक दक्षता घेतलेली आहे.
गैरहजर सदस्यांची पाठराखण
या बैठकीला जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ हे अनुपस्थित होते, असे सांगतानाच पालकमंत्र्यांनी मुद्दाम कोणी गैरहजर राहत नाही, असे स्पष्ट करीत धुमाळ यांची पाठराखण केली.
(बैठकीची दुसरी बातमी थोड्याच वेळात)