सातारा : मंगळवारपासून सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला असून, पश्चिम भागासह पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यातही ओढे-नाले तुडुंब वाहू लागले आहेत. अवघ्या चोवीस तासांत तब्बल ७.०८ टीएमसी इतका पाणीसाठा वाढण्याचा विक्रमही यंदाच्या मोसमात कोयना धरणाने केला असून, वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणही ओव्हरफ्लो झाले. दरम्यान, अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून महाबळेश्वर, पाचगणीसह अनेक शहरांचे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला असताना मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ७.०८ टीएमसीने वाढ झाली. धरणात ६८.५१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाटण तालुक्यांत तर पावसाने थैमान घातले. महाबळेश्वर येथे मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चोवीस तासांत ३६२ मिलिमीटर, कोयना येथे १७८, तर नवजा येथे १८४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सातारा शहरातही मंगळवारी दिवसभर जलधारांचे बरसणे सुरू होते. पावसाचे पाणी सखल भागात साचल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. सायंकाळनंतर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या कास परिसरातही मंगळवारी दमदार पाऊस झाला. (प्रतिनिधी) धबधबे कोसळू लागले सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे असलेल्या कोरेगाव, खटाव परिसरातही मंगळवारी पावसाने हजेरी लावली. या पावसात यंदा प्रथमच या भागातील धबधबे, ओढे व नाले खळाळून वाहू लागलेत. काही ठिकाणी गटारांतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदीत असले तरी शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सात हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग धोम-बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून प्रतिसेकंद सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग धोम धरणात सुरू आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद ३१ हजार ४०४, तर कण्हेर धरणात १२ हजार ६९९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मोरणा, तारळी, केरा तुडुंब पाटण तालुक्यातील मोरणा, तारळी, केरा, काजळी, काफना, वांग या नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे डोंगरकपारीतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडता आले नाही. अनेक ठिकाणी शेतीमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने शेती जलमय झाली. अनेक पूल पाण्याखाली वाई तालुक्यातील कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने चिंधवली येथील कृष्णा नदीवरील पूल मंगळवारी पाण्याखाली गेला. तसेच पाटण तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पांढरेपाणी, निवी, कसणी या गावांना वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. वीजवाहिन्या तुटल्याने अनेक गावे अंधारात गेली आहेत.
‘धोम-बलकवडी’ ओव्हरफ्लो!
By admin | Updated: August 3, 2016 00:19 IST