लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काही वेळा अवकाळी पावसाचाही शिडकावा होत आहे. यामुळे बळिराजा धास्तावला असून पिके आणि फळबागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करीत आहे. तरीही हातात काही पडेल का, याची शाश्वती नाही.
जिल्ह्यातील बळिराजा मागील दोन वर्षांपासून सतत निसर्गाशी सामना करीत आला आहे. २०२० मधील अतिवृष्टीत तर २५ हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले; तर ८० हजार शेतकऱ्यांना फटका बसला. त्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काळजीचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे.
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला. त्यामुळे गहू, बटाटा, घेवडा पिकांवर करपा रोग पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्वारीची पिके पोटऱ्या धरू लागली आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी जाऊन कणसे खराब होऊ शकतात. तसेच हरभऱ्यावरही रोग पडण्याची भीती आहे. द्राक्षबागधारकांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे भीतीचा गोळा आला आहे. त्यामुळे शेतकरी पिके आणि फळबागा वाचविण्यासाठी औषध फवारणी करू लागले आहेत. पदरी काहीतरी पडावे, एवढीच आशा आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांनी कांदा, गहू पिकांवर कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. अजून काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही वाया जाऊ शकतो. तसेच फळबागांकडूनही त्यांना फारशी आशा करता येणार नाही, अशी स्थिती आहे.
कोट :
तीन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी अगदी कमी लोकांना मदत मिळाली. आता तर ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यातूनही पिके वाचविण्यासाठी औषधांची फवारणी सुरू आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना सतत निसर्गाशी सामना करावा लागत आहे.
- गुलाब जगताप, माजी उपसभापती, कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती
फोटो दि.०५सातारा अॅग्रो फोटो...
फोटो ओळ : ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात कांदा पिकावर शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागले आहेत.
...................................................