कराड येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार चव्हाण बोलत होते. या वेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, जिल्हा परिषद सदस्य शंकर खबाले, पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, नरेंद्र पाटील, नाना पाटील, नितीन थोरात, राजेंद्र चव्हाण, शिवाजी मोहिते, प्रदीप जाधव, नानासो जाधव, इंद्रजित चव्हाण, उदय थोरात, जिल्हा काँग्रेसचे कायदा विभागाचे अध्यक्ष अॅड. अमित जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंधन दरवाढ अशीच चालू राहिली तर महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवीत सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. या इंधन दरवाढविरोधात काँग्रेस पक्ष देशभर व राज्यभर आंदोलन करीत आहे. आजही काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर आंदोलने करण्यात आली.
सन २०१४ च्या आधी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असतानाही देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या यूपीए सरकारच्या काळातील किमती व सध्याच्या मोदी सरकारच्या काळातील किमतीशी तुलना करता, जवळपास ५० टक्के एवढ्या कमी असतानाही, मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे नसून ते फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. यामुळे इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही मोदी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाही. याचा निषेध ही या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.