लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही बाब आता मागे पडत चालली असून मुलीचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. त्यातच शासन पातळीवरूनही जनजागृती होत असून गर्भलिंग निदानावरील बंदीमुळे मुलींचा जन्मदर वाढत चालला आहे. सातारा जिल्ह्यातही हे सुखद चित्र दिसत आहे.
आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे मुलाला आपोआपच महत्त्व प्राप्त झाले आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा समजला जातो. त्यातच गर्भलिंग निदान करण्यात येत होते. यामुळे मुलींचा मृत्यू गर्भातच होत होता. पण, गेल्या काही वर्षांत शासनाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ सारखे अनेक उपक्रम राबविले. त्याचबरोबर मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली. याचा परिणाम सकारात्मक झाला. त्यातच गर्भलिंग निदानावर बंदी आली आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढत चालला आहे. सातारा जिल्ह्यात हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९४२ पर्यंत पोहोचले आहे. ही एक सुखद बाब आहे.
चौकट :
जिल्ह्यात हजार मुलांमागे मुली किती ?
२०१७ ९२७
२०१८ ९३४
२०१९ ९३०
२०२० ९४२
२०२१ ९०५
.................................
मुलामुलींची जन्मसंख्या
वर्ष मुले मुली
२०१७ २३२११ २१५२१
२०१८ २२३५४ २०८७४
२०१९ १८७५७ १७४५३
२०२० २२९९४ २१६६७
२०२१ ६२६९ ५६७२
...........................................
लिंगनिदानास बंदी...
राज्यात गर्भलिंग निदानास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. गर्भलिंग निदान प्रतिबंध या कायद्यानुसार गर्भलिंग निवड गुन्हा आहे. सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर गर्भाचे लिंग जाणून घेण्यासाठी केला जाऊ नये, यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या कायद्याचा परिणाम चांगला झालेला आहे.
................................................