संजय पाटील -कऱ्हाड -चोरांच्या मनात जसं चांदण असतं, तसंच काहीसे लाचखोरांचंही आहे. लाचखोरांना जळी, स्थळी ‘आयकर’वाले दिसतात. त्यामुळेच लाचेच्या माध्यमातून मिळालेला पैसा ते स्वत:च्या बँक खात्यात अथवा इतरत्र न ठेवता गुंतवणुकीवर भर देतात. ही गुंतवणूक करतानाही अनेक क्लृप्त्या लढविल्या जातात. त्यातून हा ‘ब्लॅक’ मनी ‘व्हाईट’ करण्याचा प्रयत्न होता. शासकीय कार्यालयातील एक ‘फाईल’ हलवायची तर अनेकवेळा अनेकांना ‘साष्टांग’ घालावा लागतो. ‘अडला हरी...’ म्हणत बहुतांशजण चहा-पाण्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची तहान भागवतात; पण काही शासकीय अधिकारी व कर्मचारी चहा-पाण्यावर थांबत नाहीत. त्यांच्या हातात ‘हिरवी’ किंवा ‘तांबडी’ नोट सरकविल्याशिवाय कामच होत नाही. काम किरकोळ असेल तर ‘चिल्लर’वर भागते. मात्र, कामाचा आवाका मोठा असेल किंवा त्यातून लाखोंची उलाढाल होणार असेल त्या रकमेच्या टक्केवारीनुसार मागणी केली जाते. ही मागणीही सरळसरळ होत नाही. आढेवेढे घेत किंवा मध्यस्थामार्फत टेबलाखालचा ‘आकडा’ सांगितला जातो. संबंधित आकडा ऐकल्यानंतर गरजूला धक्का बसतो खरा; पण गरजवंताला अक्कल नसते, असं म्हणतात. काहीही करून काम व्हावे, अशीच गरजवंताची इच्छा असते. त्यामुळे काम होण्यासाठी घासाघीस किंवा तडजोड करून रकमेची देवाणघेवाण होते. सर्वच शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच स्वीकारत नाहीत. मात्र, जे स्वीकारतात त्यांना तो काळा पैसा पांढरा करण्याचे ‘टेन्शन’ असते. लाचेच्या माध्यमातून मिळालेला पैसा बँक खात्यात ठेवला तर ते आयकर विभागाच्या लक्षात येऊ शकते. तसेच इतर कोणत्या ठिकाणी ठेवला तर नसती भानगड मागे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी काहीजण लाचेच्या माध्यमातून मिळालेली रक्कम गुंतवण्यावर भर देतात. ही गुंतवणूक स्थावर किंवा जंगम मालमत्तेतही असू शकते. काहीजण त्या पैशातून जमीन खरेदी करून ठेवतात, तर काहीजण त्या पैशाचा फ्लॅट किंवा बंगला खरेदी करतात. मात्र, हा व्यवहार बहुतांशवेळा स्वत:च्या नावावर होत नाही. स्वत:च्या नावावर मालमत्ता वाढवली तर ते सरळसरळ डोळ्यावर येऊ शकते. त्यामुळे दुसऱ्याच्या नावावर घर, जमिनीत गुंतवणूक केली जाते. ही व्यक्ती नातेवाइक अथवा मित्रांमधीलही असते. पैसा लपविण्यासाठी अनेक क्लृप्त्यालाचेच्या माध्यमातून मिळालेला पैसा लपविण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या जातात. घर, जमिनीत पैसा गुंतवला जातो. काहीवेळ चारचाकी गाड्या किंवा सोने खरेदीतही हे पैसे वापरले जातात. जमीन खरेदी करताना माळरान असेल तरी ती खरेदी करून त्यातून उत्पन्न दाखविले जाते. ज्यामुळे लाचेच्या माध्यमातून मिळालेली रक्कम जमिनीतील उत्पन्न म्हणून समोर आणली जाते. तसेच दागिनेही शक्यतो घरामध्ये ठेवले जात नाहीत. ते इतरत्र सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात. ज्यामुळे आयकर विभागाने तपासणी केली तरी त्यांच्या हाती ठोस काहीही लागू शकत नाही.
लाचखोरांच्या मनात भीती ‘आयकर’वाल्यांची!
By admin | Updated: November 2, 2015 23:58 IST