फलटण : फलटण तालुक्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. मात्र, आठवड्यापासून सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या धास्तीने बळीराजा चिंतेत आहे.
फलटण तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. यंदा कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांनाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. मात्र गेल्या आठवड्याभरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. जानेवारी सुरू होऊनही अपेक्षित थंडी वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी, उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि थंडी कमी असल्याने गव्हावर करपा, तांबेरा येऊ लागला आहे. यासोबतच काही भागांमध्ये गव्हाला अळीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तालुक्यात उसाचे प्रचंड उत्पादन झाले असून, शेतकरी आता ऊसतोडणी झाल्यावर गहू लावण्यात मग्न झालेला आहे. काही ठिकाणी गव्हाच्या पिकांची वाढ चांगले होत असताना, प्रतिकूल वातावरणामुळे त्यांच्या पिकांना फटका बसू शकतो.
थंडी असली की गहू आणि उसाच्या पिकाला चांगला फायदा होतो. सरासरी उत्पन्न वाढते; मात्र अपेक्षित थंडी अजूनही पडलेली नाही. त्यातच सोमवारी झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले आहे, तर ऊसतोडणी कामगारांचे तात्पुरत्या निवाऱ्यामुळे भिजतच रात्र काढावी लागली आहे . या प्रतिकूल हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यालाही करप्याने वेढले आहे. त्यामुळे कांद्याची नवीन लागवड धोक्यात आली आहे.
चौकट
महागड्या औषधांची फवारणी
या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांच्या फवारण्या सुरू केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. परंतु हवामान सुधारले नाही, तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले. परिणामी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावर देखील पाणी फिरते की काय, या धास्तीने शेतकरीवर्ग संध्या चिंतेत पडला आहे.
कोट
ढगाळ वातावरण आणि अचानक आलेल्या पावसाचा द्राक्षे, गहू या पिकांवर परिणाम होऊ शकतो. गव्हावर तांबेरा, करपा रोग पडू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागू शकते. कृषी विभागाने कृषी सहायकांना बांधावर जाऊन पाहणी करायला लावली आहे.
- सुहास रणसिंग,
तालुका कृषी अधिकारी, फलटण
०५फलटण-क्रॉप
फलटण तालुक्यात यंदा गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. मात्र पावसामुळे नुकसान होण्याची भीती सतावत आहे. (छाया : नसीर शिकलगार)