लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : ‘गतिमान जीवनात माणूस आरोग्य हरवत चालला आहे. भारतीय प्राचीन आयुर्वेदात अनेक औषधांची माहिती आहे. निरोगी जीवनासाठी सदृढ आयुष्य लाभावे याकरीता आयुर्वेदाचा उपचार फायदेशीर आहे,’ असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. मोहन सोनावणे यांनी व्यक्त केले.
पानस, ता. जावली या ठिकाणी गणेश नेहरू युवा मंडळावतीने ‘आयुर्वेद सर्वांसाठी’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी सुभाष गुजर, विजय भिंताडे, वैभव गुजर, सुनील भिंताडे, शेखर गुजर, हेमंत गुजर, विजय गोळे, महेंद्र गुजर, तुषार गुजर, सुरज शेडगे, बजरंग गुजर, देवेंद्र दीक्षित, रमेश गायकवाड उपस्थित होते.
डॉ. सोनवणे म्हणाले, ‘लोकांना निरोगी व सदृढ आयुष्य लाभावे, यासाठी आयुर्वेदामध्ये असणाऱ्या विविध औषधी वनस्पती आपल्या आजूबाजूला, परिसरात मुबलक आहेत. याविषयी आपण माहिती करून घेतली पाहिजे. एक दिवसाच्या बाळापासून ते शंभर वर्षांच्या व्यक्तीपर्यंत असणाऱ्या सर्व आजारांवर आयुर्वेदामध्ये उपचार आहे. पूर्वीच्या काळी आजीबाईचा बटवा उपलब्ध होता. यात विविध औषधी वनस्पती व वस्तूंचा उपयोग करून घरच्या घरी आजारावर उपचार केले जात होते. याकरीता आज आयुर्वेदाकडे वळायला हवे. आपल्या परिसरातील वनस्पतींचे औषधी गुणधर्म व उपयोग जाणून घेत याचा उपयोग करावा.
मंडळाचे अध्यक्ष नितीन गोळे यांनी स्वागत केले. देवेंद्र दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. संतोष भांदिर्गे यांनी आभार मानले.