सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत राजघराण्यांना राजकारणापासून लांबच ठेवले होते. पण, शरद पवारांनी राजकीय घराण्यांच्या लोकप्रियतेचा आपल्या राजकारणासाठी वापर करायचा ठरवून त्यांना राजकारणात संधी दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राज घराण्यांचा जनाधार वाढल्याने आणि राजघराण्यातील नेत्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाही थोडं बाजूला करत जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या यावरून सध्या नेत्यांमध्ये मतमतांतर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणत्याही नेत्याशिवाय पक्षाच्या माध्यमातून या निवडणुका लढविण्याबाबत ठाम आहे. तशा प्रकारचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले असून जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर न लढता पक्षविरहित झाली तरी त्याचे नेतृत्व करण्यावरून मतमतांतरे आहेत. कोणी रामराजे नाईक निंबाळकर आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होईल असे म्हणत असले तरी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेतल्याशिवाय त्यांचा मार्ग सुकर होणार नाही. त्यामुळे नेतृत्वाबाबत शिक्कामोर्तब होत नाही. प्रत्येक ठिकाणी सोयीस्कर मार्ग अवलंबिला जातो. ज्याठिकाणी एखाद्या पक्षाची ताकद अधिक आहे अशा ठिकाणी इतरांना संधी दिली जात नाही. त्यामुळे इतर सदस्यदेखील आपल्या ताकदीचा अंदाज घेऊन आपल्याला संधी मिळणार म्हटल्यावर फारसा विरोध करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
बँकेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांचा विरोध होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना संचालक पदावर संधी मिळेल असे अंतर्गत ठरल्यामुळे त्यांचा विरोध मावळल्याचे दिसते. आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांचा अर्ज बाद झाला होता की करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा तो पात्र ठरविण्यात आला. त्यामुळे कोणाला संधी द्यायची आणि कोणाला रोखायचे याबाबतचे राजकारण यापूर्वीच ठरलेले आहे.
नगरपालिकेतदेखील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकाच पक्षात असूनदेखील आघाड्यांमार्फत लढण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजप कोणती भूमिका घेणार की दोन्ही राजेंच्या गटामध्ये स्वत:ला विभागून घेणार हे पहावे लागेल. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिकेत स्वतंत्र पॅनेल टाकेल. शिवसेनेनेही दोन्ही महाराजांकडे नाराज असलेल्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे चौरंगी लढत होईल अशी आपेक्षा आहे. पण, त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिकेत आपल्या काही सहकाऱ्यांमार्फत संधी शोधण्याचा नक्की प्रयत्न करेल.
रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून थोडे लांबच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील त्यांना काही अंतरावरच ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमध्ये यावेळी रामराजेंचा समावेश झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय घडामोडी या तिन्ही राजेंना लांब ठेवूनच भविष्यात होतील. याचा परिणाम राष्ट्रवादी वाढण्यासाठी होतो की राष्ट्रवादीचे नुकसान होते हे देखील भविष्यात पहावे लागणार आहे.