नागठाणे : थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी महावितरणचे अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या मागे तगादा लावला आहे. लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्याने सोमवारपासून सर्वच व्यवसाय सुरू झाले आहेत. यामुळे व्यावसायिक वीजबिल भरण्यासाठी मुदत मागत आहेत. तरीही महावितरणाचे अधिकारी वाघ अरेरावीची भाषा करून ग्राहकांना वीजबिल भरण्याचा दम भरत आहेत, असा आरोप वीजग्राहकांमधून केला जात आहे.
सलग दुसऱ्या वर्षीही लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यवसाय बंद झाल्याने कर्जाचा भार वाढला आहे. सोमवारपासून निर्बंध शिथिल झाले तरी लगेच व्यवसाय वाढीस लागणार नाही. यामुळे इतर खर्चासह वीजबिलाचा भरणा करण्यासाठी अनेक ग्राहक महावितरणकडे साकडे घालत आहेत. दररोज महावितरणचे कर्मचारी वीज तोडणीसाठी सर्वत्र फिरत आहेत. वीजबिल भरण्यास ग्राहक तयार आहेत. मात्र, मुदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहेत. महावितरणचे अधिकारी ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरत आहेत. वीजबिल भराच, अन्यथा वीजपुरवठा खंडित करतो, असा दमच भरत आहेत. यामुळे वीजबिलाच्या नावाखाली महावितरणकडून ग्राहकांची पिळवणूक सुरू आहे.