.............................................
शेकोट्या पेटू लागल्या
दहीवडी : माण तालुक्यात हळूहळू थंडी वाढू लागली आहे. यामुळे गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत रब्बी हंगामातील पिकेही चांगली आली आहेत. शेतकरी सध्या भांगलणी करून पिकांना पाणी देऊ लागले आहेत. त्यातच थंडी वाढू लागली आहे. परिणामी गारठ्यात वाढ झाल्यामुळे गावोगावी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.
.................................................
बाजारांमुळे कोरोनाचा धोका
सातारा : जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू असले तरी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. बाजाराच्या ठिकाणी अनेक गावचे ग्रामस्थ येतात. तसेच गर्दीतच खरेदी करण्यात येते. काही नागरिक तर तोंडाला मास्कही लावत नाहीत. यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. शासन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
............................
नागरिकांचा प्रतिसाद
सातारा : येथील भैरोबा डोंगरी ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातारा-सज्जनगड पदभ्रमंती उपक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरवर्षी हा उपक्रम डोंगरी ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात येतो. या उपक्रमामुळे पदभ्रमंतीच्या निमित्ताने निसर्गात राहण्याची संधी मिळते.
...................
बळीराजावर संकट
खटाव : खटाव तालुक्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवेळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील शेतकरी कधी ढगाळ वातावरण, तर कधी गारठा, तर कधी पाऊस अनुभवत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांत भीती असल्याचे चित्र आहे.
..............
कांद्याचे तरवे तेजीत
सातारा : मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. परिणामी कांदारोपे अर्थात तरव्याची मागणी वाढल्यामुळे दर तेजीत आले आहेत. पूर्वी वाफ्यावर होणारी तरवा विक्री आता फुटावर केली जात आहे.
..........
पक्ष्यांचा वावर
सातारा : येरळवाडी (ता. खटाव) नावाप्रमाणेच कुमठे मापरवाडी (ता. सातारा) तलावातही दुर्मिळ व स्थलांतरित कृष्णबलक पक्ष्यांचे आश्रयस्थान बनला आहे. सध्या या ठिकाणी ‘कृष्णबलक’च्या १२ जोड्यांचे आगमन झाले आहे. मायणी, येरळवाडी हे तलाव पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरत असतानाच कुमठे तलाव हा देखील आता दुर्मिळ आणि स्थलांतरित ‘कृष्णबलक’चे आश्रयस्थान बनले आहे.
...
द्राक्षबागांचे नुकसान
म्हसवड : माणमध्ये गेले दोन दिवस अचानक सर्वत्र ढगाळ वातावरणाबरोबरच धुके टिकून राहून रात्रं-दिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्याने आंबा, द्राक्ष, रब्बी हंगामातील फुलोऱ्यात आलेल्या ज्वारीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पळसावडे, देवापूर, काळचौंडी, जांभुळणी, वरकुटे मलवडी, हिंगणी, शेनवडी आदी गावांच्या परिसरात द्राक्ष व आंब्याच्या बागा मोठ्या संख्येने आहेत.