सातारा : खून प्रकरणातील आरोपी अक्षय पवार याने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केल्याप्रकरणी चौकशीस प्रारंभ झाला आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, अहवाल आल्यानंतर पोलीस अधीक्षक पुढील कार्यवाही करणार आहेत. दरम्यान, फरार अक्षयचा शोध चोवीस तासांनंतरही सुरूच आहे.आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) याचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांना हवा असणारा मुख्य सूत्रधार अक्षय लालासाहेब पवार (२०) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी अटक केली होती. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले असताना तो पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून गेला होता. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिले आहेत. आदेशानुसार घनवट यांनी सहायक उपनिरीक्षक काळे यांच्यासह हवालदार वायदंडे, अविनाश भोसले आणि नितीन शेळके या कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन घटनेची माहिती मागविली आहे. या माहितीवर आधारित अहवाल ते पोलीस अधीक्षकांना सादर करतील. (प्रतिनिधी)
आरोपी पलायनप्रकरणी चौघांवर टांगती तलवार
By admin | Updated: July 19, 2015 23:43 IST